जिल्ह्यात केंद्रीय मंत्री आल्यास जाब विचारणार

जिल्ह्यात केंद्रीय मंत्री आल्यास जाब विचारणार

ich271.jpg
98917
इचलकरंजी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे महागाईविरोधात जनआक्रोश मोर्चा प्रांत कार्यालयावर काढला.
--------------
जिल्ह्यात केंद्रीय मंत्री आल्यास जाब विचारणार
राजू शेट्टी; इचलकरंजीत ‘स्वाभिमानी’तर्फे महागाईविरोधात मोर्चा
इचलकरंजी, ता. २७ : नागरिक महागाईने होरपळले आहेत तरीही सत्ताधारी व विरोधक तोंड बंद करून गप्प आहेत. सरकारी अधिकाऱ्यांची दादागिरी, भ्रष्टाचार, पिळवणूक यामुळे समाज गोंधळलेला आहे. महागाईवर नियंत्रण आणले नाही तर आता जनता सरकारला सोडणार नाही. जिल्ह्यात आता एकाही केंद्रीय मंत्र्याचा दौरा होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री आलाच तर त्याला भर रस्त्यात अडवून महागाईचा जाब विचारला जाईल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महागाईच्या विरोधात भव्य जनआक्रोश मोर्चा आज प्रांत कार्यालयावर काढला. मोर्चातील नागरिकांना संबोधीत करताना ते बोलत होते. मोर्चाला राजवाडा चौकातून सुरवात झाली. महागाईविरोधात अग्रस्थानी आसूड ओढत संताप व्यक्त केला. मुख्य मार्गावरून गांधी पुतळा चौक, मलाबादे चौकामार्गे हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. मोर्चा मार्गावर महागाईने होरपळणाऱ्या जनतेने उन्हाचे चटके सहन करत लक्षवेधी फलकातून आक्रोश व्यक्त केला. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रांत कार्यालय चौकात मोर्चात सहभागी झालेल्यांना विविध मान्यवरांनी संबोधीत केले.
दरम्यान कोणतीही कल्पना न देता मोर्चाच्या जनजागृती पत्रकावर उल्लेख केल्याने लाल बावटा पक्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेविरोधात निषेध व्यक्त केला. पक्षाला न विचारता पक्षातील काही प्रमुख मान्यवरांची नावे पत्रकावर छापली. त्यामुळे या मोर्चाशी लालबावटा व मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा काहीच संबंध नसल्याचे जाहीर करत मोर्चात सहभागी न होण्याचे आवाहनही त्यांनी केले. आम आदमी पक्षाने मात्र पत्रकात उल्लेख नसतानाही मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला. विविध मागण्यांचे निवेदन महिलांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांना दिले. मोर्चात बसगोंडा बिरादार, विकास चौगुले, आण्णासाहेब शहापूरे, हेमंत वणकुंद्रे, सतीश मगदूम, विश्‍वास बालिघाटे आदी सहभागी झाले होते.
---------
हम दो हमारे दो सरकार
महागाई वाढत असताना सरकारने वीजेचे दरही वाढवून ठेवले आहेत. दर वाढीत अख्या देशात महाराष्ट्र राज्य नंबर वन बनले आहे. देशात हम दो हमारे दो सरकार असून हम दो म्हणजे मोदी व शहा तर हमारे दो म्हणजे अदानी आणि अंबानी असा उल्लेख करत वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी टीका केली.
--------
तर आयुक्तांना चिखलात नेऊ
महापालिका क्षेत्रातील पाणंद रस्त्यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. याबाबत मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. येत्या पावसाळ्यात पाणंद रस्ते दुरूस्त होणे गरजेचे आहे. अन्यथा महापालिका आयुक्तांनाच पावसाळ्यात होणाऱ्या या रस्त्यांवरील चिखलातून नेऊ, असा इशारा माजी खासदार श्री.शेट्टी यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com