रामदास आटवले दौरा

रामदास आटवले दौरा

01046
...

राजर्षींच्या स्मारकासाठी केंद्राकडून मदत देऊ

केंद्रीयमंत्री रामदास आठवले : ठाकरे यांनी बारसू प्रकल्पाला विरोध करू नये

कोल्हापूर, ता. ६ ः ‘राजर्षी शाहू महाराजांच्या आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी राज्य शासनाने योजना जाहीर केली आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या खर्चातून भव्यदिव्य स्मारक करावे. निधी कमी पडू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलेनच. याशिवाय महापालिकेने प्रस्ताव पाठवला तर केंद्र सरकारकडून काही मदत लागणार असल्यास मी पाठपुरावा करेन,’ असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज दिले.
येथील शाहू समाधीस्थळी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना श्री. आठवले यांनी अभिवादन केले. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. शाहू महाराजांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जिव्हाळ्याचे संबध होते. त्यांनी डॉ. आंबेडकर यांना शिष्यवृत्ती दिली होती. राजर्षी शाहू महाराज सर्व जाती धर्माचे राजे होते. जाती व्यवस्था संपवली पाहिजे, अशा दृष्टिकोनाचे ते राजे होते. त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चळवळ चालवतो. मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो.’
ते पुढे म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते शरद पवार हे देशाचे नेते आहेत. वयोमानामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. पक्ष सांभाळणारा दुसरा नेता नसल्याने शरद पवार यांच्याकडेच पक्षाची धुरा आहे. बारसूत उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना प्रकल्पास मंजुरी दिली होती; मात्र श्री. ठाकरे महाविकास आघाडीत असल्याने ते या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. कोकणाच्या विकासासाठी असे प्रकल्प आले पाहिजेत. रोजगार मिळाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला विरोध झाला तर विकास होत नाही. ठाकरे यांनी प्रकल्पाला विरोध करू नये, अशी आमची विनंती आहे.’

महिला कुस्ती स्पर्धेसाठी खासदार ब्रजभूषण सिंह यांना निमंत्रण दिले होते. त्यांच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन झाले, याविषयी ते म्हणाले, ‘ब्रजभूषण सिंह यांच्यावर काही आरोप आहेत, ते आरोप खोटे असून, त्याची चौकशी व्हावी, असे त्यांचेही मत आहे. न्यायालयात केस आहे. त्यांना विरोध करणारे जसे आहेत, तसेच त्यांचे स्वागत करणारेही आहेत, मात्र या विषयात कोणी राजकारण करू नये. महिला कुस्तीत पुढे येतात, मुली भाग घेतात, ही चांगली गोष्ट आहे.’
....

भाजप-शिवसेनेची सत्ता पुन्हा येईल

‘राज्यातील राजकीय परस्थिती चांगली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाणार नाही, असे आम्हाला वाटते. शिंदे- फडणवीस सरकार चांगले चालले आहे. २०२४ मध्ये हे सरकार पुन्हा सत्तेत येईल,’ असेही आठवले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com