आर्किटेक्ट असोसिएशन

आर्किटेक्ट असोसिएशन

फोटो ः १२८५१
कोल्हापूर : असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनियर्सतर्फे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार. शेजारी राजेश पाटील, हसन मुश्रीफ, अजय कोराणे, व्ही. बी. पाटील, चेतन नरके आदी.

विकासकामांसाठी
कठोर भूमिका ठेवा
---
अजित पवार; पंचगंगेचे प्रदूषण रोखा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : लोकप्रतिनिधींनी शहराचा विकास करताना कठोर भूमिका ठेवावी. मतांवर डोळा ठेवून निर्णय घेऊ नयेत. त्या निर्णयावर पाच ते दहा टक्के लोक नाराज होत असले, तरी ९० टक्के लोक समाधानी होत असतात. नाराज लोकांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या उपजीविकेची पर्यायी व्यवस्था करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज येथे दिला. कोल्हापूर प्रादेशिक विकास आराखडा तातडीने तयार करण्यात येईल व कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सक्षमीकरण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस ॲण्ड इंजिनिअर्सतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील असोसिएशनच्या सभागृहात कार्यक्रम झाला. त्यात श्री. पवार म्हणाले, की कऱ्हा नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी काम केले. पर्यावरणाचा ऱ्हास न होता काम करायला हवे; अन्यथा नदीच्या पुरात गावाचे बेट होऊन, नदीच्या पात्रात गाळ साठतो. पर्यायाने मूळ पदावर पूरस्थिती निर्माण होते. भराव टाकल्याने पूरस्थितीचा फटका अनेक कुटुंबांना बसतो. अधिकाऱ्यांनी नदी, नाले स्वच्छ ठेवण्यासाठी वृक्षारोपण करावे. त्यासाठी मोठा खर्च येत नाही. कंपन्यांची मदत घेऊन ते काम करता येते.
ते म्हणाले, ‘‘वीस वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या बारामतीत आमूलाग्र बदल झाला आहे. पंचवीस वर्षांपूर्वीचे बेळगाव व कोल्हापूर यात जमीन-अस्मानचा फरक झाला आहे. बेळगाव विकास प्रक्रियेत कोल्हापूरच्या पुढे गेले आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी विकासासाठी कठोर निर्णय घ्यावेत. पंचगंगा नदी प्रदूषण होऊ नये, याची जबाबदारी सर्व घटकांनी स्वीकारावी.’’ आयुक्तांनी नदी-नाल्यातील गाळ काढण्याचे काम करायला हवे. ते काय करतात, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. या वेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, उद्योजक व्ही. बी. पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, चेतन नरके उपस्थित होते.
दरम्यान, पूरनियंत्रण व पूरप्रतिबंधक कामाबाबत कार्यवाही करावी, कोल्हापूर प्रादेशिक विकास आराखड्याचा फेरसुनावणी अंतिम अहवाल मंजूर करावा, जिल्हा जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट करावा, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी, शहर विकास आराखडा तातडीने तयार करावा, या मागण्यांचे निवेदन आर्किटेक्ट असोसिएशनतर्फे श्री. पवार यांना देण्यात आले.

चौकट
निवडणुकांबाबत सरकारकडे इच्छाशक्ती नाही
राजकीय इच्छाशक्ती असेल तर निवडणुका होतात. ती इच्छाशक्ती दाखविण्याची तयारी विद्यमान सरकारकडे नाही. कदाचित, त्यांना भीती वाटत असेल. मधल्या काळात महाविकास आघाडी सरकार घालविण्याचे काम त्यांनी केले. ते समाजाला आवडलेले आहे, असे मला वाटत नाही. शहराचा विकास होत असताना मूळ वास्तू सौंदर्य हरवत चालले आहे, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com