
एसटी कॅन्टीन
''कॅन्टीन’ सुविधेकडे ‘एसटी’चे दुर्लक्ष
परिसरात हवी स्वच्छता; प्रवाशांना पदार्थ मिळावेत किफातशीर दरात
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. २४ ः विविध सवलत योजनांमुळे एसटी प्रवासी संख्येत राज्यभरात १५ लाखाने वाढ झाली. त्याचबरोबर महसुल वाढला. मात्र, त्यातुलनेत सुविधा सक्षम देण्यात एसटी महामंडळाची कंजुशी आहे. याची प्रचिती एसटीच्या अस्वच्छ कॅन्टीन सेवेवरून दिसत आहे. अनेक प्रवाशांना उपवासापोटी प्रवास करण्याची शिक्षा भोगावी लागते.
एसटीमधून दीर्घ पल्ल्याचा प्रवास करताना चहा नाश्त्यासाठी गाडी वीस मिनिटे थांबवली जाते. त्यासाठी एसटीने प्रमाणित केलेल्या हॉटेलवर बस थांबवणे अपेक्षित असताना अनेकदा चालक महामार्गावरील किंवा राज्यमार्गावरील अनेक खासगी हॉटेलवर बस थांबवतात. पणजीवरून येताना कणकवलीजवळ, सोलापूरला जाताना सांगोल्याजवळ, पुण्यावरून येताना शिरवळजवळ, सोलापूरवरून पुण्याला जाताना भिगवन बस थांबवली जाते. पुण्यावरून नाशिकाला जाताना संगमनेरजवळ अनेक खासगी हॉटेलमध्ये बस थांबवल्या जातात. काही ठिकाणी स्वच्छतागृहाची चांगली सेवा आहे. तर अनेक ठिकाणी हॉटेलमधील पदार्थ महागअसतात. पदार्थ अपुरे देतात. कांदा, लिंबू , लोणचे, चटणी असे पूरक पदार्थ देणे टाळले जाते. नाश्त्यासाठी सत्तर-ऐंशी रूपये, वरण भातासाठी ७० रूपये, जेवणासाठी मोजके पदार्थ ताटाला लावूनही शंभर ते दिडशे रूपये आकारतात तेव्हा प्रवाशांची लुट होते.
थोड्या फारफरकाने अशीच स्थिती एसटी बसस्थानकावरील कॅन्टीनची आहे. तुळजापूर, सांगोला, कणकवली, राजापूर, धाराशीव, सोलापूरसह ग्रामीण भागातील काही मोठ्या शहरातील कॅन्टीन त्याचे भटारखान्यातील अस्वच्छता पाहिली तर खाण्याची इच्छा मावळून जाते.
अनेक एसटी बसस्थानकावर कॅन्टीनचा ठेका वर्षानुवर्षे एकाच मालकाचा आहे. कागदोपत्री निविदा भरल्या जातात. सोयीच्या लोकांनाच कॅन्टीनचा ठेका दिला जात असल्याची चर्चा आहे.
कॅन्टीन सेवा अथवा हॉटेलमधील सेवा चांगली न मिळाल्यास एसटीत चालकाकडे तक्रार नोंदवहीत प्रवाशांनी तक्रार नोंदवता येते, त्याची दखल घेऊन एसटी प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.
कोट
एसटी महामंडळाने स्वमालिकीची उपहारगृहे चालविण्यास द्यावीत. महामार्गावर बस धावते तेथे हॉटेल स्वच्छता, दर्जेदार पदार्थ व किफातशीर दर असतील अशा ठिकाणी बस थांबविण्यास मान्यता द्यावी.
-संदीप शिंदे, राज्यध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना