पूर्वेकडील १४ गावांची तहान भागणार

पूर्वेकडील १४ गावांची तहान भागणार

gad287.jpg
05521
खणदाळ : पूर्व भागातील पाणी योजनांच्या जॅकवेलला पाणी पोहचल्याने गावांची तहान भागणार आहे.
-----------------------------------------------------
पूर्वेकडील १४ गावांची तहान भागणार
गडहिंग्लज तालुका : चित्री-आंबेओहोळच्या पाण्याने नांगनूर ओलांडले
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : प्यायला, कोणी पाणी देता का पाणी अशी आर्त हाक देणाऱ्‍या पूर्व भागातील १४ गावची आता तहान भागणार आहे. चित्री व आंबेओहोळ प्रकल्पातून हिरण्यकेशी नदीत सोडलेले पाणी नांगनूर (गोटूर) बंधारा ओलांडून गेले आहे. यामुळे सध्या तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याने ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे.
आठवडाहून अधिक काळ पूर्व भागातील नूल, मुगळी, हिटणी, मुत्नाळ, खणदाळ, हसूरचंपू, हेब्बाळ, नांगनूर, अरळगुंडी, कडलगे, इदरगुच्ची, चंदनकूड, हलकर्णी, बसर्गे या गावच्या पाणी योजनांचे जॅकवेल कोरडे पडले होते. जरळी बंधाऱ्‍याच्या पूर्वेला हिरण्यकेशी नदीचे पात्र कोरडे पडल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. यामुळे संबंधित गावच्या ग्रामस्थांना खासगी पाणी स्त्रोतांवर अवलंबून रहावे लागले. त्यासाठी भटकंतीही करावी लागली. शेतीला राहू द्या, आधी प्यायला पाणी देण्याची हाक ग्रामस्थ देत होते.
दरम्यान, २१ मे रोजी चित्री व आंबेओहोळ धरणातील पाणी हिरण्यकेशी नदीत सोडले होते. पाणी पूर्व भागात वेळेत पोहोचावे यासाठी उपसाबंदीही लागू केली होती. मात्र बंदी आदेश असतानाही कृषी पंपधारकांनी शेतीसाठी पाण्याचा उपसा कायम ठेवला होता. अखेर पाटबंधारे विभागाच्या पथकाकडून रात्रीची गस्त सुरु झाल्यानंतर पाणी उपसाला आळा बसला. परिणामी पात्रातील पाणी पूर्व भागात जाण्यास सोयीचे झाले. आज दुपारनंतर हे पाणी नांगनूर बंधारा ओलांडून पुढे गेल्याचे सांगण्यात आले. खोत बंधाऱ्‍यापर्यंत पाणी पोहचल्यानंतर नांगनूरपासून पश्‍चिमेकडील बंधाऱ्‍यांचे दरवाजे बंद करत येणार आहेत.
----------------
गरजेलाच पाणी द्या
उपसाबंदीचा आजचा (ता. २९) शेवटचा दिवस आहे. त्यानंतर पाण्याचा उपसा जोरात सुरु होणार आहे. पाणी संपण्याच्या भितीने काही शेतकरी वारंवार पिकांना पाणी देतात. मात्र, अधिक पाण्यामुळे जमीन पाणथळ बनून त्याचा पोत खराब होण्याचा संभव आहे. यामुळे शेतकऱ्‍यांनी गरज असेल तरच पाणी द्यावे. पाऊस लांबलाच तर यापेक्षाही अधिक बिकट परिस्थिती होणार आहे. म्हणून पिण्यासाठी पाणी शिल्लक ठेवण्याची जबाबदारीही शेतकऱ्‍यांवरच आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com