जयसिंगपुरात मुख्याधिकाऱ्यांवर
शाईफेक, पोलिसांचा सौम्य लाठीमार

जयसिंगपुरात मुख्याधिकाऱ्यांवर शाईफेक, पोलिसांचा सौम्य लाठीमार

05529
जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) ः विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समन्वय समितीतर्फे सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यान मुख्याधिकाऱ्यांवर अज्ञाताने शाईफेक केली. त्यानंतर घटनास्थळी उडालेला गोंधळ.

जयसिंगपुरात मुख्याधिकाऱ्यांवर
शाईफेक, पोलिसांचा सौम्य लाठीमार
पालिकेवर मोर्चा, रास्ता रोको; पुतळा ठिकाणाच्या वादाचे पडसाद

सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २९ : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा वाद विकोपाला गेला आहे. सोमवारी सि.स.नं. १२६६ ऐवजी १२५१ मध्ये पुतळ्याची कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समन्वय समितीने आज पालिकेवर मोर्चा नेला. सक्षम अधिकारी नसल्याने संतप्त मोर्चेकऱ्यांनी पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पोलिसांनी रोखला. यानंतरही सक्षम अधिकारी मोर्चासमोर येत नसल्याने आंदोलकांनी थेट शहरातील कोल्हापूर-सांगली महामार्गावरील क्रांती चौकात रास्ता रोको करत ठिय्या मारला. या ठिकाणी बराच वेळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र, अधिकारी नसल्याने पोलिसांचे प्रयत्न निष्पळ ठरले. मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी मोर्चेकरांसमोर आल्यानंतर सि.स.नं. १२६६ च्या प्रस्तावावरून आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्याचवेळी मुख्याधिकाऱ्यांवर शाईफेक झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर आंदोलकांची पांगापांग झाली.
जुन्या न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा, अशी सकल बहुजन समाज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समन्वय समितीची मागणी आहे. अनेक दिवसांपासून यासाठी आंदोलनेही सुरू आहेत. आज याच मागणीसाठी आंबेडकरवादी कार्यकर्ते सकाळी बौद्ध विहारात जमले. त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. क्रांती चौक येथे मोर्चा आल्यानंतर बसस्थानकात प्रस्तावित असणाऱ्या पुतळ्याच्या समर्थनार्थ लावण्यात आलेला डिजिटल फलक वादाचे कारण बनला. कार्यकर्त्यांनी आधी हा फलक हटवावा, अशी मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली. आंदोलकांचा संताप पाहून पोलिसांनी तातडीने हा फलक हटविला. यानंतर हा मोर्चा पुढे रेल्वेस्टेशनमार्गे पालिकेसमोर आला.
पालिकेसमोर मोर्चा आल्यानंतर मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी पालिकेत अनुपस्थित होते. ही बाब मोर्चेकऱ्यांना समजताच गोंधळ आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली. मुख्याधिकारी नसतील, तर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांना मोर्चासमोर यावे लागेल, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. यावरून पालिकेसमोर सुमारे दोन तास घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू होता. त्या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
मुख्याधिकारी आंदोलनस्थळी आल्यानंतर बसस्थानकातील पुतळ्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा आग्रह धरण्यात आला. यावेळी आंदोलकांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने गर्दीतील एकाने थेट मुख्याधिकाऱ्यांवर शाईफेक केली. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने क्रांती चौकात पोलिस व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली. यामुळे मार्गावरील प्रवाशांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

मुख्याधिकाऱ्यांना बसविले रस्त्यावर
सुमारे तीन ते चार तास आंदोलनकर्त्यांना हुलकावणी दिलेले मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी क्रांती चौकात आंदोलकांसमोर आले. त्यांनी रस्त्यावर बसूनच चर्चा करावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांचा संताप लक्षात घेऊन मुख्याधिकारी कोल्हापूर-सांगली महामार्गावर चर्चेसाठी बसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com