
फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्वाची
05927
फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक
साक्षरता महत्वाची ःप्रा. ककडे
कोल्हापूर, ता. ३० ः सध्याच्या धावपळीच्या जीवनात नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. ती टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्वाची आहे, असे मत अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. विजय ककडे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात अर्थशास्त्र विभागातर्फे मंगळवारी अर्थ साक्षरता उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘वित्तीय साक्षरता व स्वेच्छा निवृत्ती’ याविषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रा. डी. के. मोरे होते. प्रा. ककडे म्हणाले, ‘आजच्या काळात आर्थिक निरक्षरतेमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक वाढली आहे. शिक्षण, पर्यावरण, संगणक आणि मोबाईल साक्षरता यापेक्षाही आर्थिक साक्षरता महत्वाची आहे. आर्थिक संपत्ती मिळविणे, त्याचा संचय करणे व ती वाढविणे हा प्रत्येकाचा उद्देश असतो. मिळालेल्या संपत्तीचा कसा विनियोग केला याचा हिशोब महत्वाचा आहे.’ आर्थिक प्रवर्तक अनिल पाटील म्हणाले, ‘कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना आर्थिक सल्ला घेणे महत्वाचे आहे. भविष्यातील आर्थिक गुंतवणूकीसाठी आर्थिक सल्लागाराची भूमिका महत्वाची आहे. विविध कंपन्याचे शेअर्स घेताना कंपन्याचा भूतकाळ व भविष्य काळाचा अभ्यास करून शेअर्स खरेदी करावे.’ प्रा. मोरे म्हणाले, ‘प्रत्येकांनी आर्थिक नियोजन केल्यास आपला व कुटुंबाचा भविष्यकाळ चांगला असेल.’ समन्वयक डॉ. के. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पी. पी. दावणे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. पी. एन. देवळी यांनी सूत्रसंचालन केले. डी. के. कमलाकर यांनी आभार मानले.