लोकसभा राजकारण

लोकसभा राजकारण

मुश्रीफ नसतील तर पर्याय कोण?

रणांगण लोकसभेचे ः व्ही. बी., के. पी. पाटील यांच्यानंतर संजय घाटगेंच्या नावाची चर्चा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३१ ः आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच विरोधी पक्षांची स्थिती ‘करो या मरो’ सारखी असणार आहे, त्यातून पक्षाच्या पातळीवर उमेदवार ठरवण्यासाठी बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या मुंबईत काल झालेल्या बैठकीत कोल्हापुरातून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यासाठी आग्रह धरला असला तरी स्वतः मुश्रीफ यांना मात्र अजूनही राज्याच्या राजकारणात अधिक रस आहे, त्यातून त्यांनी उमेदवारी नाकारल्यास पर्याय कोण? हा राष्ट्रवादीसह ‘महाविकास’ मधील अन्य पक्षांसमोरचा मोठा प्रश्‍न असेल.
आजच्या घडीला राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेकडेही प्रबळ उमेदवारांची वानवा आहे. भाजपकडे ताकदीचा असा उमेदवार नसल्याने विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनाच भाजपात घेऊन उमेदवारी देण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत ‘महाविकास’ मध्ये ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाऊ शकते, पण अलिकडेच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्याकडे प्रबळ उमेदवार नसेल तर महाविकासमधील अन्य पक्षांना जागा सोडण्याचे मान्य केले आहे. त्यातून दुसरा हक्क राष्ट्रवादीचा राहतो, कारण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून २०१९ पर्यत जिल्ह्यातील या दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. त्यातून श्री. मुश्रीफ यांच्या नावाचा आग्रह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे काल धरला.
श्री. मुश्रीफ यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक सोपी आहे. कारण, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तर दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात कागल वगळता मुश्रीफ यांनी थेट कोणावर टीका तर नाहीच पण टोकाचे राजकीय वैरही कोणासोबत घेतलेले नाही. त्यांच्यावर झालेली ईडी, सीबीआयची छापेमारी, घोरपडे कारखानाप्रकरणी दाखल झालेला गुन्हा आणि अजूनही या चौकशींचा त्यांच्यामागे असलेला ससेमिरा यात अडथळा ठरू शकतो. त्या जोडीला मुश्रीफ हे अल्पसंख्याक समाजाचे असल्याचा त्यांच्यावर असलेला शिक्काही महत्‍वाचा आहे. त्याबाबत यापूर्वी अतिशय टोकाची टीका होऊन त्यांनी कागलचे मैदान सलग पाचवेळा मारले आहे ही त्यांच्यादृष्टीने जमेची बाजू आहे.
पण त्यातूनही मुश्रीफ यांनी नकार दिलाच तर राष्ट्रवादीलाही ताकदवान उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल. सद्यस्थितीत पक्षाकडे माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील पर्यात असू शकतात. यातील व्ही. बी. यांना छत्रपती घराण्याचे पाठबळ मिळू शकते. के. पी.-ए. वाय. यांच्यातील वाद मिटवण्यासाठी एकाला लोकसभेला पाठवण्याचा पर्याय होऊ शकतो. महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यास यापैकी कोणीही उमेदवार असेल तर आव्हान निर्माण करू शकतात. पण पक्षाने मात्र माजी मंत्र्यांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केल्याने श्री. मुश्रीफ यांच्यासमोर पर्याय नसेल. तरीही शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांना ऐनवेळी राष्ट्रवादीत घेऊन त्यांनाही रिंगणात उतरले जाण्याची शक्यता आहे. श्री. घाटगे यांचे जिल्ह्यातील आणि राज्य पातळीवरील काँग्रेस नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. ते लोकसभेला गेले तर कागल विधानसभेतील मुश्रीफ यांच्या विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. त्यातून मुश्रीफ यांच्याकडूनच घाटगे यांच्या नावाचा आग्रह होण्याची शक्यता आहे. तशी चाचपणीही त्यांनी कालच्या बैठकीत केली. त्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फारसा प्रतिसाद दिला नसला तरी भविष्यात याच पर्यायावर विचार होण्याची शक्यता आहे.
............

काहीही होऊ शकते
२००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी दिल्यानंतर समोर कोणाचे आव्हानच नसल्यासारखी स्थिती असताना दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ऐनवेळी रिंगणात उतरून मैदान मारले. अशीच स्थिती २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात प्रा. संजय मंडलिक पावणे तीन लाख मतांनी विजयी झाले. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीतही जिल्ह्यातील सद्य राजकीय स्थिती पाहता ऐनवेळी एखादा नवखा उमेदवार महाविकासने दिला तर तो आव्हान उभे करू शकेल.
............

गृहित धरलेले चालत नाही

लोकांना गृहित धरून नेत्यांनी घेतलेला निर्णय जिल्ह्यात चालत नाही हा इतिहास आहे. यापूर्वी दिवंगत दिलीप देसाई यांनी शिवसेना सोडली, पण नंतर त्यांच्या पत्नींचा पराभव झाला. अशीच स्थिती संभाजीराजे व महाडिक यांच्या निवडणुकीत पहायला मिळाली. त्यामुळे विद्यमान खासदारांनाही ही निवडणूक एवढी सोपी नाही. त्यात राष्ट्रीय पातळीवरील महागाई, बेरोजगारी, शेती मालाचे पडलेले भाव हे निकालावर प्रभाव टाकू शकणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करूनच सर्वच पक्षांना उमेदवार ठरवावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com