
मान्सूनपूर्व कामात हलगर्जी कराल तर कारवाई करणार - जिल्हाधिकारी
06431
मॉन्सूनपूर्व कामात हलगर्जी केल्यास कारवाई
जिल्हाधिकारी राहुल रेखावार; जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार सर्व कामे येत्या १० जूनपूर्वी पूर्ण करावीत. मॉन्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. मॉन्सूनपूर्व तयारीबाबत जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘पूर परिस्थितीमुळे जीवित अथवा वित्तहानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पूरप्रवण गावांमधील नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस त्या-त्या गावांमध्ये तैनात ठेवाव्यात. या बसेस सुस्थितीत असल्याची खात्री करावी, जेणेकरून त्या पावसाच्या पाण्याने बंद पडणार नाहीत. नदी प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नदीतील भराव, कचरा काढून घ्या. धोकादायक झाडांच्या फांद्या काढा. पाण्याखाली जाणाऱ्या पुलांच्या व रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स व नागरिकांना माहिती देणारे बॅनर तयार करून घ्या. भूस्खलन होणारे रस्ते, धोकादायक वळणांचे रस्ते, वाहन चालवताना वाहनचालकांना अडथळा निर्माण करणारी रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे आदींची माहिती घेऊन तत्काळ उपाययोजना करा. धोकादायक इमारतींची जलदगतीने दुरुस्ती करुन घ्या. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिक व जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी योग्य नियोजन करा. जनावरांच्या चारा छावण्या उभारण्यासाठीची कार्यवाही वेळेत करा. पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास बी-बियाणे, खतांचा पुरेसा साठा तयार ठेवा’
बैठकीला इचलकरंजी महापालिका आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जलसंपदा कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
‘२४ तास दक्ष राहा’
आपत्कालीन परिस्थितीत काम करताना अडचण निर्माण होवू नये, यासाठी त्या त्या विभागांचे नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवून तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करा. या कालावधीत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची संपर्क क्रमांकासह यादी तत्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करा. १५ जूननंतर अधिकारी- कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करु नयेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी रेखावार केल्या.