राष्टवादी बूथ कमिटी बैठक

राष्टवादी बूथ कमिटी बैठक

M06638
...
सरकारबाबत जनतेत नाराजी

आमदार शशिकांत शिंदेः राष्ट्रवादी कॉंग्रेसची बूथ कमिटी बैठक

कोल्हापूर, ता. २ ः ‘ देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर हुकुमशाही विरोधातील लढाई सुरू करून २०२४ च्या निवडणुकीत विजयाचा इतिहास घडवूया. त्यासाठी बूथ कमिट्या बळकट करा,’ असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पश्‍चिम महाराष्ट्राचे विभागीय बूथ प्रमुख, आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. सरकारबाबत जनतेत नाराजी आहे, हिंमत असेल तर उद्या निवडणूक घेऊन दाखवावी. प्रचार न करताही जनता सरकार उलथवून टाकेल’, असेही त्यांनी सांगितले.
मार्केटयार्डमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आज बूथ कमिटी आढावा बैठक माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व आमदारांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘राजकीय स्थित्यंतराच्या या कालावधीत लोकशाहीचा खून पाडला जात आहे. या प्रवृत्तीविरोधातील लढाई जिद्दीने जिंकायची आहे. त्यासाठी नियोजन आवश्‍यक असून पक्षाने प्रमुखांवर बूथ कमिटींची जबाबदारी दिली आहे. ही लढाई सोपी नसून माझ्यासह साऱ्यांचीच ही परीक्षा आहे. राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्यातील पक्ष नाही हे दाखवून द्या. राज्यातील सरकार हे विघ्नसंतोषी लोकांचे आहे. भ्रष्टाचार संपवू असे सांगणाऱ्या पंतप्रधानांनी या सरकारच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली तर तेच महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करतील. राज्यातील सत्ता ज्या पद्धतीने घेतली आहे ते लोकांना रूचलेले नाही.’
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘पक्षासाठी निरपेक्षवृत्तीने, प्रामाणिकपणे काम केले तर २०२४ मध्ये दोन लोकसभा व दहा विधानसभा मतदारसंघात शंभर टक्के यश मिळवू शकतो. बेरोजगार, महागाईने जनता त्रस्त आहे. पण जातीधर्मात भांडणे लावून लक्ष दुसरीकडे वेधायचे काम सुरू आहे. त्यासाठी बूथ कमिट्यांनी केंद्र, राज्यातील सरकारकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा घराघरात जाऊन वाचावा.’
जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, ‘चौकात बसून मुंबई, राज्यातील चर्चा करत बसण्यापेक्षा बूथ कमिटीचे काम करा. पक्ष स्थापनेनंतर काही काळ पडझड झाली. पण ठाकरे गट, कॉंग्रेस सोबत काम करून महाविकास आघाडीचे दहा आमदार तसेच दोन खासदारही निवडून आणू. त्यासाठी पक्षाला आमदारकीच्या चार जागा मिळाव्यात.’ यावेळी आमदार अरूण लाड व सारंग पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले. बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी आभार मानले. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आमदार राजेश पाटील, व्ही. बी. पाटील, नाविद मुश्रीफ, राजीव आवळे, भैय्या माने, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.
...

शासन दारात नेऊन उपयोग नाही

‘राज्य सरकारने शासन आपल्या दारी उपक्रम घेतला आहे. पण ज्या अधिकाऱ्याकडून नेमणुकीसाठी पैसे घेतले जात असतील तर तो नागरिकांची कामे पैसे घेतल्याशिवाय करणार का? शासन व अधिकारी जोपर्यंत बदलत नाहीत, तोपर्यंत शासन आपल्या दारी नव्हे, घरात आली तरी काही उपयोग होणार नाही’, असा टोला आमदार मुश्रीफ यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com