पाठ्यपुस्तक पुनर्वापराची संकल्पना बासनात

पाठ्यपुस्तक पुनर्वापराची संकल्पना बासनात

पाठ्यपुस्तक पुनर्वापराची संकल्पना बासनात
एकात्मिक संचांचा परिणाम; पर्यावरण संवर्धन, निर्मिती खर्चातील बचतीवर सोडावे लागणार पाणी
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना यंदा एकात्मिक संचाचे वितरण केले जाणार आहे. हा निर्णय तसा स्वागतार्हच आहे. पण, यामुळे मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापराची संकल्पना मागे पडली आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्याचे उद्दिष्ट दूर गेले असून पाठ्यपुस्तक निर्मिती खर्चातील बचतीवरही पाणी सोडावे लागले आहे.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक योजना राबवली जाते. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका व खासगी अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे विषयनिहाय पाठ्यपुस्तकाऐवजी एकात्मिक संचांची निर्मिती केली आहे. प्रत्येक इयत्तेचे चार भाग केले आहेत. शिवाय प्रत्येक पाठामागे एक कोरे पान जोडलेले आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी ही सोय केली आहे.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने अवलंबिलेला हा मार्ग स्वागतार्हच म्हणावा लागेल. पण, यामुळे मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबवलेली पाठ्यपुस्तक पुनर्वापराची संकल्पना बासनात गुंडाळावी लागली आहे. तत्कालिन पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी दरवर्षी ६० टक्केच नव्या पाठ्यपुस्तकांचे वितरण तर ४० टक्के जुन्या पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराची संकल्पना मांडली होती. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली होती. पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी कागद मोठ्या प्रमाणात लागतो. त्यासाठी झाडांची तोड करावी लागते. पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरातून पर्यावरणाची हानी टाळण्याबरोबरच निर्मिती खर्चात बचत केली जात होती. आता एकात्मिक संच निर्मितीमुळे पाठ्यपुस्तक पुनर्वापराची संकल्पना दूर केली आहे.
-----------
एका पानाचा घोळ
एकात्मिक संचामध्ये प्रत्येक पाठानंतर एक कोरे पान जोडलेले आहे. विद्यार्थ्यांनी त्यावर प्रश्नांची उत्तरे सोडवावित यासाठी ही व्यवस्था केली आहे. वह्यांचे ओझे कमी करण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना प्रत्येक पाठासाठी एकच पान पुरेसे ठरणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. दुसरीकडे या पानाचा विद्यार्थ्यांनी वापर केल्यामुळे पुढील वर्षी या संचांचा पुनर्वापर करणे अशक्य आहे. शासनाने हे कोरे पान घातले नसते तर कदाचित एकात्मिक संचांचाही पुनर्वापर करणे शक्य झाले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com