
गांधी, नेहरुंना बदनाम करण्याचा विडा
gad62.jpg
07451
गडहिंग्लज : महात्मा गांधी विचार मंचतर्फे झालेल्या कार्यक्रमात डॉ. सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केले.
------------------------
गांधी, नेहरुंना बदनाम करण्याचा विडा
डॉ. सुभाष देसाई; गडहिंग्लजला गांधी विचार मंचतर्फे कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक दिग्गज हे उच्चशिक्षित होते. जवाहरलाल नेहरू किंवा वल्लभाई पटेल यांचे गांधीजींशी मतभेद असूनसुद्धा गांधींची समाज जागृतीची ताकद किती अफलातून आहे हे त्यांनी अनुभवले होते. आज काही लोकांनी गांधी, नेहरूंना बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे. ही मनोविकृती त्यांनी सोडून देणे हे गरजेचे आहे. नव्या पिढीने गांधी, नेहरुंना अभ्यासायला हवे, असे मत डॉ. सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
येथील महात्मा गांधी विचार मंचतर्फे कार्यक्रम झाला. या प्रसंगी डॉ. देसाई बोलत होते. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. देसाई म्हणाले, ‘जगभर महात्मा गांधी यांच्यावर अनेक विद्यापीठात संशोधन सुरू आहे. अनेक देशांमध्ये त्यांचे पुतळे उभारलेले आहेत आणि अनेक देशातील अहिंसात्मक चळवळी मागची प्रेरणा महात्मा गांधींचा अहिंसात्मक स्वातंत्र्य लढा आहे. असे असताना भारतामध्ये त्यांच्या कटआउटवर गोळ्या झाडण्याची मनोविकृती प्रगट होते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. महात्मा गांधींचे जीवन आणि आचरण हे आदर्शवत होते. जीवनात सत्याचा आग्रह, चारित्र्यसंपन्न जीवन आणि समाजासाठी प्रेम, करुणा किती महत्त्वाची आहे हे गांधींच्या विचारातून आपण समजू शकतो.’ प्रा. जे. बी. बारदेस्कर, प्रा. आप्पासाहेब कमलाकर, प्रा. सुभाष कोरे, प्रा. शिवाजी होडगे, प्रा. अरविंद बारदेस्कर, टी. पी. पाटील, अमोल देसाई आदी उपस्थित होते.