
बिद्री कारखाना डिस्टलरी
के. पी. पाटील यांच्यामुळे ‘बिद्री’ची
डिस्टिलरी प्रकल्प मान्यता रखडली
---
आमदार प्रकाश आबिटकर यांचा आरोप
कोल्हापूर, ता. ६ ः बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची मान्यता कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांच्या नाकर्तेपणामुळे रखडल्याचा आरोप आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला.
कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार आबिटकर म्हणाले, की डिस्टिलरीचे काम ७५ टक्के पूर्ण केले असून, आम्ही विरोध केल्याने ते रखडले, असे विधान चेअरमन पाटील यांनी केले. प्रकल्प उभारताना आवश्यक परवानगी घेतल्यावर कामास सुरुवात करायची असते. येथील प्रकल्पाची सुरुवात करताना त्यांनी विविध परवानगी, राज्य उत्पादन विभागाची परवानगी अद्याप घेतलेली नाही. कारखान्याकडून २७ ऑक्टोबर २०२१ ला परवानगीसाठीचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येथील अधीक्षकांकडे सादर केला आहे. त्या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार होता. कारखान्याने पाठविलेला प्रस्ताव अपूर्ण होता, परवानगी न घेता सादर केला असल्याने त्यांनी मंजुरी दिली नाही. उत्पादन शुल्क विभागाकडून त्रुटींची पूर्तता करण्याबाबत वेळोवेळी कळवून त्यांची पूर्तता केली नाही. यानंतर नवीन मंत्री शंभूराज देसाई झाले. परंतु, कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने अद्याप प्रस्ताव प्रलंबित आहे.
माजी संचालक दत्ताजीराव उगले, शेतकरी संघाचे प्रशासक मंडळ अध्यक्ष सूर्याजी देसाई, बाजार समितीचे माजी संचालक कल्याणराव निकम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाबा नांदेकर, राज्य ‘आत्मा’ समितीचे सदस्य अशोक फराकटे आदी उपस्थित होते.