
ग्रामीण भागात मंगल कार्यालयांची गरज
ग्रामीण भागात मंगल कार्यालयांची गरज
कोवाड, ता. २३ ः कडाक्याचे ऊन तर कधी जोराचा पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे लग्न समारंभ करताना गावागातून लोकांना अडचणी निर्माण होत आहेत. वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे लोकांची जीवनशैलीही बदलावी लागत आहे. खेडेगावातून घरासमोर मंडपात लग्न कार्य होते. कडाक्याच्या उन्हात किंवा पावसात उभे राहून वधु-वरांवर अक्षतारोपण करावे लागते. दिवसेंदिवस यामध्ये आता अडचणी निर्माण होत असल्याने गावागावातून मंगल कार्यालय उभे राहण्याची गरज निर्माण होत आहे.
लग्न कार्य म्हटले की पै-पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाईक व ग्रामस्थांची गर्दी असते. ग्रामीण भागात अजूनही घरासमोर मंडपात लग्न कार्य होते. हळदीचे कार्य केले जाते. त्यानंतर गल्लीत उघड्यावर जमिनीवर लोकांना जेवायला बसवले जाते. ऊन डोक्यावर घेऊन वऱ्हाडी मंडळी जेवण करतात. कधी कधी पाऊस सुरु होतो आणि सर्वांची तारंबळ उडते. पण अलिकडे ऊन्हाचा पारा वाढत आहे. ऊन सोसण्यापलिकडे असल्याने लोकांना घराबाहेर पडणेही अशक्य होत आहे. पण लग्न कार्य हे पवित्र बंधन समजले जात असल्याने वातावरणात कितीही बदल झाला तरी नातेवाईक लग्न कार्याला हजेरी लावतात. गेल्या आठवड्यात सोसाट्याचा वारा आणि गारांचा वर्षाव झाला. अशा वेळी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक वर्षी वातावरणात अचानक बदल होत आहे. निसर्गाचे ऋतु चक्र बिघडत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात सामाजिक समारंभ पार पाडण्यासाठी आता मंगल कार्यालय उभे होणे ही काळाची गरज निर्माण होत आहे.
---------------------
ग्रामीण भागात रितीरिवाजाप्रमाणे दारात लग्नकार्य व्हावी ही वधु-वर पक्षाच्या लोकांची इच्छा असते. परंतू ऋतुमानात बदल होत असल्याने लग्न कार्यात अडचणी निर्माण होत आहेत. कधी पाऊस तर ऊन्हाचा कडाका यामुळे उघड्यावर कार्यक्रम करणे अवघड झाले आहे. त्यासाठी मंगल कार्यालयाची गरज निर्माण होत आहे.
-यशवंत सोनार, माजी सभापती, चंदगड पंचायत समिती