
शिवसेना निवेदन
फोटो
....
अण्णासाहेब पाटील महामंडळातील
अनागोंदी कारभारामुळे लाभार्थी हतबल
शिवसेना ठाकरे गटाचे निवेदन
कोल्हापूर, ता. २८ : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून व्याज परतावा मिळालेला नाही. यासाठी लाभार्थ्यांना मुंबई येथे ये-जा करावी लागत असून, हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. या अनागोंदी कारभारामुळे या मंडळाच्या निर्मितीच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात असून, लाभार्थी हतबल झाले आहेत. यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा आशयाचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनत म्हटले आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजना राबविण्यात येते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून या महामंडळात अनागोंदी कारभार सुरू आहे. लाभार्थ्यांच्या काही तांत्रिक अडचणी मुंबई मुख्यालयाकडून पूर्ण होत नसल्याने लाभार्थ्यांना मुंबईमध्ये जाऊन त्या अडचणी सोडवून घ्याव्या लागत आहेत. महाराष्ट्रात ३८ हजार व कोल्हापूर जिल्ह्यात ३ हजार ५०० लाभार्थ्यांचा गेल्या ६ महिन्यांपासूनचा व्याज परतावा जमा झालेला नाही. राज्यातील विद्यमान सरकार मराठा समाजाकडे सर्वच बाबतीत दुर्लक्ष करीत आहेत आणि त्याचा परिणाम या महामंडळावर झाला आहे .
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, अवधूत साळोखे, राजेंद्र पाटील, विशाल देवकुळे, विनोद रोहिडा, सागर पाटील, युवराज खंडागळे, गोविंद वाघमारे आदी उपस्थित होते.