
महावितरणच्या ‘गो ग्रीन’ला १२ हजारांवर ग्राहकांची पसंती
महावितरणचा लोगो
‘गो ग्रीन’ योजनेत
१२ हजारांवर ग्राहक
महावितरणचा पेपरलेस व्यवहारावर जोर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : कोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजार ८५४, तर सांगली जिल्ह्यातील आठ हजार ३५४ ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेत ग्राहकांनी पेपरलेस व्यवहारावर जोर दिला असल्याचे स्पष्ट होत आहे. योजनेत ग्राहकांना छापील कागदी बिलाऐवजी ई-मेलद्वारे पेपरलेस बिल पाठवले जाते. प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफिस प्रणाली सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. त्या दिशेने महावितरणने बिलांच्या बाबतीत यापूर्वीच काम सुरू केले आहे. गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन ग्राहक पर्यावरण वाचविण्यास मदत करत आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते. महावितरणच्या मोबाईल ॲपवरूनही नोंदणी करता येते. नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला ओटीपी क्रमांक पाठविण्यात येतो. त्यामुळे नेमक्या संबंधित ग्राहकाकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते. त्यानंतर ग्राहकाला त्याने दिलेल्या ई-मेल आयडीवर एक लिंक पाठविली जाते. लिंकवर क्लिक करून पडताळणी केली की, प्रक्रिया पूर्ण होते. पुढच्या बिलापासून ग्राहकाला त्याची बिले ई-मेलने पाठविली जातात व कागदी छापील बिले बंद केली जातात. ग्राहकाला हवे तेव्हा त्याला ई-मेलने आलेल्या बिलाची प्रिंट घेता येते. त्यासोबत सर्वच ग्राहकांना त्यांच्या बिलाविषयी नियमांची माहिती देणारे एसएमएसही पाठविले जातात.
------------------
चौकट
राज्यात तीन लाख ५६ हजार ग्राहकांकडून स्वीकार
गो ग्रीन योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांमध्ये पुणे परिमंडळ आघाडीवर आहे. या परिमंडळात ८९,९३६ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्या पाठोपाठ कल्याण (४०,१४४), भांडूप (३४,९१७), नाशिक (३३,१४१) आणि बारामती (२६,३९८) यांचा क्रमांक लागतो. राज्यात महावितरणचे दोन कोटी आठ लाख घरगुती ग्राहक असून या योजनेचा आतापर्यंत राज्यातील तीन लाख ५६ हजार ग्राहकांनी लाभ घेतला आहे.