
राष्ट्रीय चर्चासत्र
स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात
व्यक्तिरेखांवर संशोधन व्हावे
चर्चासत्रातील सूर ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठात आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : ‘नवसंशोधकांनी अजूनही स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात व्यक्तिरेखांवर संशोधन करून त्यांचा इतिहास सर्वसामान्य लोकांसमोर आणावा’, असा सूर आज येथे व्यक्त झाला.
भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, शिवाजी विद्यापीठातील इतिहास अधिविभाग व छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्रातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आज झाले. ‘भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील पश्चिम महाराष्ट्रातील ज्ञात-अज्ञात नायक’ असा त्याचा विषय होता. वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र झाले.
मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख यांनी चर्चासत्रातून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या कामगिरीवर प्रकाश पडेल. त्यांचे कार्य समाजासमोर येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच विद्यापीठातर्फे सुरु असलेल्या ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ उपक्रमाची माहिती देऊन नवीन संशोधकांनी आणखी संशोधन करून अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान समाजासमोर आणण्याचे आवाहन केले.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अरुण भोसले यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या सुरवातीच्या इतिहासावर प्रकाश टाकला. १८५७ ते १८८५ म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रसची स्थापना आणि त्यानंतर कॉंग्रेसमधील मवाळ कालखंड (१८८५-१९०५), जहाल कालखंड (१९०५-१९२०), गांधी युग (१९२०-१९४७) या सर्व टप्प्यांवर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ज्या प्रकारे बदल होत गेला त्याचे सटिक विश्लेषण केले. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे सदस्य सचिव प्रा. डॉ. उमेश कदम यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाच्या विविध भागात परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. केंद्राच्या समन्वयक डॉ. निलांबरी जगताप यांनी प्रास्ताविक केले.
इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात डॉ. विलास पोवार, प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर, प्राचार्य डॉ. अजितकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले. डॉ. नंदा पारेकर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले.