
बाजार समिती
‘त्या’व्यापाऱ्यांचे स्वतंत्र
मतदान घेण्याची मागणी
कोल्हापूर, ता. २८ : शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ज्या १७९ व्यापाऱ्यांच्या मतदार पात्रतेबाबत शंका व्यक्त झाल्या आहेत, अशा व्यापाऱ्यांचे स्वतंत्र मतदान घ्यावे, अशी मागणी बाजार समितीचे माजी संचालक किरण पाटील यांनी केली. त्याविषयीचे निवेदन त्यांनी जिल्हा शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्राधिकरणाकडे दिले.
पाटील यांनी सांगितले की, बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्था सदस्य, व्यापारी, अडते व माथाडी यांचे मतदान ग्राह्य मानले जाते. यात बाजार समितीकडून ज्या १२१७ व्यापारी मतदार म्हणून नावांची यादी प्राधिकरणाकडे पाठवली गेली. त्यातील १७९ व्यापारी मतदारांना मतदार म्हणून पात्रतेविषयी शंका उपस्थित झालल्या आहेत. यात व्यापारी म्हणून कागदपत्रे अपूर्ण तसेच व्यापार नसताना व्यापारी परवाना म्हणून नोंद करणे, व्यापाऱ्यांचा दोन वर्षे कालावधी पूर्ण न होणे, एकाच गावातील चाळीसहून अधिक व्यापाऱ्यांना व्यापारी परवाना दिला जाणे, अशा विविध मुद्द्यांवर आक्षेप नोंदवले आहेत. असे आक्षेप असतानाही बाजार समितीच्या निवडणुकीत त्या व्यापाऱ्यांना मतदान करण्यास मान्यता मिळाली आहे. आक्षेप असलेल्या व्यापाऱ्यांच्या मतांवरून पुढे कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या १७९ व्यापाऱ्यांचे स्वतंत्र मतदान घ्यावे, अशी मागणी केली आहे.