जलजीवनने ग्रामीण रस्त्यांची चाळण

जलजीवनने ग्रामीण रस्त्यांची चाळण

जिल्हा परिषद ... लोगो
...

जलजीवनने ग्रामीण रस्त्यांची चाळण

ग्रामस्थांची झाली गैरसोय; पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी

सदानंद पाटील, सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता.१६: जिल्ह्यातील सर्व म्हणजेच १०२५ गावांत जल जीवन मिशन योजनेतून पाणी योजनांचे काम सुरू आहे. या कामासाठी मुख्य रस्त्यांसह गावांतर्गत रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. काम पूर्णत्वानंतर हे रस्ते ठीकठाक केले नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे.

गेल्या वर्षभरापासून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावागावात पाणी योजनांचे काम सुरू आहे. १०२५ गावांत १२०५ योजना घेण्यात आल्या आहेत. यामध्ये काही गावांसह अनेक वाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे योजनांची संख्या वाढली आहे. या योजनांसाठी सुमारे १२०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व गावांमध्ये नळ पाणी योजनांचे काम धडाक्यात सुरू आहे.

जल जीवन अंतर्गत गावातील विहीर, बोअरवेल यासह अंतर्गत वितरण व्यवस्था, मुख्य वितरण नलिका यांची कामे सुरू आहेत. या कामासाठी गावाबाहेर आणि गावांतर्गत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. गावातील सर्व रस्ते तीन फूट खोदण्यात आले आहेत. बऱ्याच गावांनी रस्त्यांसाठी निधीची तरतूद करून रस्ते चकाचक केले होते. मात्र पाणी योजनेसाठी रस्ते खोदकाम झाल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

पिण्याच्या पाणी योजनेसाठी होणारी रस्ते खोदाई लोकांनी गृहीत धरली होती. मात्र ठराविक अंतराची खोदाई झाल्यानंतर व त्यामध्ये पाईप टाकल्यानंतर तो रस्ता मुजवणे आवश्यक होते.तसेच खोदाईनंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी कंत्राटदारांची आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी टेंडरमध्ये आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. असे असतानाही अनेक गावात रस्ते दुरुस्त केलेले नाहीत. खोदाईची माती टाकून पाईपलाईन मुजवण्यात आली आहे.

खोदाईचे चर काँक्रीटने मुजावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे खड्डा तयार होणे, पाईपलाईनला गळती लागणे असे प्रकार घडत आहेत. वास्तविक पाईपलाईन चर काँक्रिटच्या माध्यमातून दुरुस्त करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेली आहे. तर अनेक गावांना अशी तरतूद करण्याबाबत देखील पाणीपुरवठा विभागाने सूचना दिल्या आहेत. तरीही कंत्राटदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले दिसते. त्यामुळेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
...

‘ मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. मात्र हे काम करत असताना नव्याने केलेल्या तसेच जुन्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आलेली आहे. पाईपलाईनचे काम झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने चर मुजवणे आवश्यक होते. त्याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने याची गंभीर दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी.

राजेश पाटील, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com