
दुषित पाणी नागरिकांचा पालिकेवर मोर्चा
फोटो...
कुरुंदवाड ः दूषित पाणीप्रश्नी जाब विचारताना नागरिक.
दूषित पाणीप्रश्नी अधिकारी धारेवर
संतप्त नागरिकांचा कुरुंदवाड पालिकेवर मोर्चा; मुख्याधिकाऱ्यांसमोर ठिय्या
कुरुंदवाड, ता.१४ ः येथील ढेपणपूर भागातील नळांना गटारीचे पाणी येत असल्याने या भागातील संतप्त नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व शंख नाद आंदोलन करीत मुख्याधिकाऱ्यांसमोर ठिय्या मारला. मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत ठेकदाराला बोलावून घेतले व तत्काळ काम पूर्ण करा, अन्यथा काळ्या यादीत टाकू, अशी सक्त ताकीद दिली. यावेळी मोर्चातील नागरिकांनी नळाला आलेले दूषित पाणी पालिकेच्या दारात ओतून निषेध नोंदवला.
येथील बापू बिल्डिंग ते चव्हाण घरापर्यंतच्या आरसीसी गटारीच्या कामासाठी पूर्ण जुनी गटर खुदाई केली आहे, त्यामुळे अनेकांच्या पाणीपुरवठा होणाऱ्या पाईप लिकेज होऊन त्यातून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्याने संतप्त नागरिकांनी आज पालिकेवर मोर्चा काढला होता. पालिकेत कोणीच अधिकारी हजर नसल्याने संतप्त नागरिक आणि कर्मचाऱ्यांत शाब्दिक चकमक झाली. यावेळी संतप्त नागरिकांनी कर्मचाऱ्यांना पाणी पिऊन बघा, आम्ही चार दिवस हे गटारीचे पाणी पित आहोत. तुम्ही एकदा हे पाणी पिऊन बघा, असे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बजावले.
मुख्याधिकारी चौहान आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला बोलावून घेतले असता नागरिकांनी या ठिकाणी गटारीचे काम सुरू आहे. मात्र, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामाचे ठेकेदार कधीच कामावर येत नाहीत तसेच दर्जेदार काम होत नाही याबाबत कोणतीही कारवाई पालिकेकडून आतापर्यंत केली नाही, असा तक्रारीचा पाढा वाचला. आम्हाला गटारी नकोत, असा पवित्राही नागरिकांनी घेतला. याबाबत मुख्याधिकारी चौहान यांनी या तक्रारींचे निरसन करून कामाचा दर्जा तपासण्याचे आदेश बांधकाम अभियंता योगेश गुरव यांना दिल्यानंतर नागरिक शांत झाले. लवकरात लवकर हे काम चंगल्या दर्जाचे करून दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी किरण मालगावे, यासीन बागवान, दीपक लोहार, दत्तात्रय कडोलीकर, भरत पट्टेकरी, जगन्नाथ बिडकर,अतुल तावदारे, पप्पू चव्हाण, वहिद पठाण, दत्तात्रय लोहार, सादिक बागवान, बबलू भोसले, अक्षय चव्हाण आदी उपस्थित होते.
...