
अमृत योजना घोसरवाडमधूनच करा.
घोसरवाडहून इचलकरंजीला
पाणी देण्यास पाठिंबा
बाबासाहेब पुजारी : ‘सिद्धेश्वर’ची मागणी रास्त
कुरुंदवाड, ता. १७ : इचलकरंजीसाठी पाणीपुरवठा करणारी अमृत पाणी योजना सुळकूडमधून न होता ती घोसरवाडमधून व्हावी, अशी सिद्धेश्वर पाणीपुरवठा योजनेने केलेली मागणी रास्त असून तसे झाल्यास शिरोळ तालुक्यातील दानवाडपर्यंत दूधगंगा नदी कायमपणे प्रवाहित राहून दरवर्षी उन्हाळ्यात नदी कोरडी पडणार नाही. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. त्यामुळे सुळकूडऐवजी घोसरवाडमधूनच व्हावी यासाठी सिद्धेश्वर पाणीपुरवठा संस्थेच्या प्रस्तावाल पाठिंबा असल्याची माहिती माजी सरपंच बाबासाहेब पुजारी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
श्री. पुजारी म्हणाले, ‘खासदार धैर्यशील माने यांच्याकडे सिद्धेश्वर पाणीपुरवठ्याच्या शिष्टमंडळाने घोसरवाडमधून पाणी योजनेचा प्रस्ताव दिला आहे. सुळकुड ते दत्तवाडपर्यंत नदीचे पन्नास किलोमीटरपर्यंत अंतर आहे. कर्नाटकातून वळसा घेऊन नदी आली आहे. चार टीएमसी पाण्याचा साठा कर्नाटककडून उचलला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात दूधगंगा नदी कोरडी पडते. इचलकरंजी अमृत योजना सुळकुडमधून झाल्यास शिरोळ तालुक्यातील तेरा गावांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. हीच अमृत योजना घोसरवाडमधून कार्यान्वित झाली तर जलसाठा वाढवून मिळेल व दत्तवाड बंधाऱ्याची उंची वाढविल्यास जलसाठा वाढून नदी तुडुंब भरून राहील. अमृत योजनेतून नेहमी पाणी नदीत सोडले जाईल. त्यामुळे आम्हालाही पाणी मिळून तेरा गावांचे नंदनवन होईल.
श्री. पुजारी म्हणाले, ‘योजना घोसरवाडमधून झाल्यास तेरा गावांचे कल्याण होणार आहे. त्यामुळे पोटशूळ उठल्याने राजकीय रंग देत योजनेला काही मंडळी विरोध करत बेताल वक्तव्य करत आहेत. याला जनता भीक घालणार नाही. सिद्धेश्वर पाणी पुरवठ्याच्या प्रस्तावाला पाठिंबा आहे.’ यावेळी बबन शिंदे, प्रताप पाटील, गुरुपाद स्वामी, आप्पा कमते, राजेंद्र कोकणे, अनिल संकपाळ, धनपाल चौगुले, दत्ता कमते, सिद्राम पुंदे, चंद्रकांत पोवार, सुरेश चौगुले, दिनकर गवंडी, गिरीश निर्मळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.