
राजाराम कारखाना एकशे बावीस गावातील सभासदांचा आहे आणि त्यांचाच राहणार - अमल महाडिक
02548
विरोधकांकडून ‘डी. वाय.’मधील
साडेचार हजार सभासद कमी
अमल महाडिक; भेंडवडेत बैठक
नागाव, ता. १३ : ‘आमच्या विरोधकांनी गगनबावड्यातील डी. वाय. पाटील कारखान्यात एका रात्रीत चार हजार पाचशे सभासद कमी करून सहकार संपवला आणि सभासदांचे हक्क काढून घेतले, असा आरोप माजी आमदार अमल महाडिक यांनी केला. राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेंडवडेतील बैठकीत ते बोलत होते.
अमल महाडिक म्हणाले, ‘राजाराम कारखाना १२२ गावांतील सभासदांचा आहे. तो तसाच राहावा यासाठी लढाई आहे. प्रदीर्घ काळ सत्ता असूनही महाडिकांनी कधी सहकारी संस्थेचे नाव बदलणे, सभासद कमी करणे, कर्मचाऱ्यांना द्वेषभाव ठेवून त्रास देणे अशी प्रवृत्ती ठेवली नाही. याउलट सत्ता असलेली प्रत्येक संस्था वाढवण्याचे आणि सहकार जपण्याचं काम महाडिक कुटुंबाने केले आहे.
आधी महाडिक यांच्या पॅनलमधून निवडून आलेले आणि चेअरमनपद भोगून विरोधी आघाडीत गेलेली माणसं जर आमच्या नेतृत्वावर बोलत असतील, तर त्यांना मतपेटीतून उत्तर देण्याइतके कारखान्याचे सभासद सुज्ञ आहेत, अशा शब्दात माजी चेअरमन शिवाजी पाटील यांनी सर्जेराव माने यांचा समाचार घेतला. अमल महाडिक यांनी आज कारखाना कार्यक्षेत्रातील लाटवडे, भेंडवडे, खोची, हालोंडी गावांचा दौरा केला. प्रमुख नेत्यांसह सभासद शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. विरोधी आघाडीकडून सातत्याने टीका करणारे सर्जेराव माने यांच्या गावातूनच अमल महाडिक यांनी दौऱ्याला सुरुवात केल्याने सर्वत्र चर्चा होती.