
राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उद्यापासून काम बंद आंदोलन
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे
उद्यापासून काम बंद आंदोलन
नागाव, ता. ९ : यावलकर समितीच्या शिफारशी स्वीकारून कलम ६१ व उपदान योजनेच्या जाचक अटी रद्द कराव्यात, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उद्या सोमवार ( ता. १० ) पासून काम बंद आंदोलन होत आहे. राज्यातील सत्तावीस हजार ग्रामपंचायतीचे सुमारे साठ हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष राजू वायदंडे यांनी सांगितले.
सोमवार (ता.१०) ते गुरुवार ( ता. १३) चार दिवस चालणाऱ्या या आंदोलनात ग्रामीण भागातील झाडू कामगार, दिवा बत्ती कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारीही सहभागी होणार असल्याने मोठी गैरसोय होऊ शकते.
राज्याच्या स्थापनेपासून ग्रामपंचायत कर्मचारी दुर्लक्षित आहे. त्याला नगरपंचायत व महापालिका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी. कलम ६१ रद्द करावे किंवा त्यात सुधारणा करावी. अभय यावलकर समितीच्या शिफारशी जशा आहेत तशा स्विकाराव्यात. ग्रामपंचायत सुधारित वेतनातील वीस महिन्यांचा फरक मिळावा, आदी मागण्यांचे निवेदन उद्या राज्यातील सर्व पंचायत समितींमध्ये गट विकास अधिकारी यांना देण्यात येणार आहे. मंगळवारी ( ता. ११ ) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी व प्रशासक यांना निवेदन देण्यात येईल. बुधवारी ( ता. १२ ) जिल्हाधिकारी आणि गुरुवारी ( ता. १३ ) तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी काही काळ धरणे आंदोलन होईल, असे श्री. वायदंडे यांनी सांगितले.