
सरवडे
‘बिद्री’च्या सहवीज प्रकल्पात ९६ कोटींचा अपहार
ः
मारुतीराव जाधव यांचा आरोपः पुनर्लेखापरीक्षणाची मागणी करणार
सरवडे, ता.९: बिद्री साखर कारखान्याच्या ताळेबंदामध्ये फेरफार करून सहवीज प्रकल्पात २०१७ पासून गेल्या पाच वर्षात ९६ कोटी ५९ लाख २४ हजार ८१२ रुपयांचा अपहार अध्यक्ष के. पी. पाटील व संचालक मंडळाने केल्याचा आरोप ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव (गुरुजी) यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या प्रकल्पाचे पुनर्लेखापरीक्षण करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तुरंबे (ता.राधानगरी) येथील सिद्धिविनायक मंदिरात बिद्री साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जाधव म्हणाले, ‘कोणत्याही साखर कारखान्याची एफआरपी साखरेच्या उताऱ्यावर ठरते. जिल्ह्यातील बहुतेक कारखान्यांनी २०२०-२१ च्या हंगामात एफआरपीपेक्षा ४२ रुपयांपासून १८९ रुपये प्रति टन जास्त दर दिलेला आहे. मात्र बिद्रीने कधीही एक रुपया जास्त दिलेला नाही. मग बिद्रीचा कारभार लय भारी हे के .पी पाटील कसे म्हणतात? बिद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाचा उतारा भौगोलिक परिस्थितीमुळे पूर्वीपासून चांगला आहे. त्यामुळे याचे श्रेय के. पी .पाटील हे लाटत आहेत. २०१० पासून २०१६ पर्यंत बिद्रीचा साखर उतारा तेरापेक्षा अधिक होता, मात्र जेव्हा केंद्र शासनाने एफआरपीवर उसाचा प्रति टन दर ठरवण्याचे बंधनकारक केले, त्या वर्षापासून २०१६ ते आजअखेर उतारा तेरा पेक्षा कमी आलेला आहे. त्यामुळे साखर उताऱ्यात एक टक्के जाणीवपूर्वक घसरण करून सभासदांचा प्रतिटन ३०० रुपये तोटा करत पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.’
यावेळी दत्ताजीराव उगले, अर्जुन आबिटकर, अरुण जाधव, अशोकराव फराकटे, नंदकिशोर सूर्यवंशी, मदन देसाई, कल्याण निकम, नंदकुमार ढेंगे उपस्थित होते.