
शिरोली : शिरोलीकरांची पाण्यासाठी वणवण
शिरोलीत नागरिकांची
पाण्यासाठी वणवण
जलवाहिनीच्या गळतीचे सत्र सुरूच
शिरोली पुलाची, ता. १५ : येथील पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे वारंवार येथील पाणीपुरवठा खंडित होत आहे. परिणामी तिन्ही बाजूने पंचगंगा नदीचा वेढा असलेल्या शिरोलीकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर महाडिक आघाडीने अनधिकृत पण नळ कनेक्शनची शोध मोहीम हाती घेतली आहे. याचवेळी वारंवार ठिकठिकाणी जलवाहिनी फुटणे, इंटेकवेलमध्ये गाळ साचणे, मुख्य जलवाहिनीमध्ये जाणीवपूर्वक बादली, पोते व काट्यांचा कचरा टाकणे अशा कारणाने पाणीपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अनेक दिवस नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी नाही लावला तर काही दिवसांवर असलेलल्या राजाराम साखर कारखाना निवडणुकीत विरोधकांच्या निशाण्यावर हा मुद्दा येण्याची शक्यता आहे.
कोट
योजनेच्या जलवाहिनीची एका ठिकाणची गळती काढल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा गळती लागत आहे. तरीही गळती काढण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-पद्मजा करपे, सरपंच
कोट
पाणी योजनेवरून शाहू आघाडीला लक्ष्य करणारे आज सत्तेत आहेत. त्यांनी शिरोलीकरांना दररोज पाणी मिळेल याचे नियोजन तरी निट करावे.
-शक्ती यादव, ग्रामपंचायत सदस्य