कोल्हापूर : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गांधीनगरसह १३ गावांच्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेच्या ३४४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली. आता या गावांत प्रत्येक घरास नळजोडणी करता येणार असून, त्याचा शासन आदेश आज काढण्यात आल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. गांधीनगरसह १३ गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करीत होतो. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या तांत्रिक छाननी समितीने १९ मेच्या बैठकीत मंजुरी दिली.
त्यानंतर पुणे प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांची ३१ मेस तांत्रिक मान्यता मिळाली. त्यानंतर या योजनेच्या ३४३ कोटी ६८ लाख ६१ हजारांच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. २० गावांसाठी नियोजन केले होते. काही गावांनी नकार दिल्याने गांधीनगरसह १३ गावांसाठी ही योजना कार्यान्वित केली जाईल. योजना पूर्ण झाल्यावर महिन्यात जिल्हा परिषद ताब्यात घेईल. देखभाल व दुरुस्तीकरिता योजनेच्या किमतीच्या १० टक्के रक्कम लोकवर्गणीच्या स्वरूपात ग्रामपंचायतीकडे ठेवणे आवश्यक आहे. योजना स्वयंनिर्भर बनवण्यासाठी पाणीपट्टी निश्चित करणे, त्यात वाढ करणे हे निर्णय ग्रामपंचायत घेईल. ही योजना ३० वर्षांच्या प्रकल्पित लोकसंख्येसाठी तयार करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, सचिव संजीव जयस्वाल यांचे आमदार ऋतुराज पाटील यांनी विशेष आभार मानले आहेत.
या गावांचा समावेश
गांधीनगर, वळिवडे, गडमुडशिंगी, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कणेरी, कळंबे तर्फ ठाणे, न्यू वाडदे, गोकुळ शिरगाव, कंदलगाव.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.