कर्जमाफीसह ‘हे’ प्रश्‍नही ऐरणीवर...

कर्जमाफीसह ‘हे’ प्रश्‍नही ऐरणीवर...

राज्यातील विरोधकांची संघर्ष यात्रा आज (गुरुवारी) सातारा जिल्ह्यात येत असून, कऱ्हाड, दहिवडी व सातारा येथे जाहीर सभा होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या हेतूने संघर्ष यात्रेचा लढा सुरू आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा म्हणून सातारा ओळखला जात असला तरी येथील शेतकरी अनेक समस्यांना सोबत घेऊन मार्ग काढत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या या समस्या लक्षात घेऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने कर्जमाफीच्या मुख्य मागणीसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रखडलेल्या अनेक प्रलंबित प्रश्‍नांचा विचार व्हायला हवा. तालुकावार या प्रमुख प्रश्‍नांची कायमस्वरूपी उत्तरे शोधण्याची गरज आहे. त्याचा पाठपुरावाही होणे आवश्‍यक आहे. ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी या प्रश्‍नांचा घेतलेला मागोवा...  

खंडाळा 
धोम-बलकवडी कालव्यालगतच्या पश्‍चिमेकडील ११ गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न व्हावेत
नीरा-देवघरचे कालवा खोदाईचे काम वेगात करून वाघोशीच्या पुढे कालवा खोदाईचे काम सुरू करावे
गावडेवाडी, शेखमिरवाडी व वाघोशी लिफ्टची कामेही त्वरित सुरू करा
कांद्याला १०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यापेक्षा निर्यातबंदी उठवून १००० ते १२०० रुपयांपर्यंत हमी भाव द्यावा 
ग्रामीण भागातील शेती वीजपंपाचे विजेचे भारनियमन कमी करावे
जलयुक्त शिवार योजनेतील कामांना गती मिळावी

कऱ्हाड 
अनेक गावांतून मागणी येऊनही टॅंकर सुरू नाहीत 
पहिल्यांदाच ३९ गावांत शासनाकडून टंचाई घोषित 
कऱ्हाड- पाटणमध्ये शेतीपंपाची १५४३ वीज कनेक्‍शन पेंडिंग
टंचाईतील एकही काम सध्या तालुक्‍यात सुरू नाही 
टेंभूचे पाणी मेरवेवाडी तलावात सोडण्याचे काम कागदावरच
वाकुर्डे योजनेला वीजबिलाचा ‘शॉक’ कायमच 
तारळी धरण कामाच्या दर्जावरही संघटनांचा आक्षेप 

खटाव 
जिहे-कटापूर योजनेचे रखडलेले काम पूर्ण व्हावे
काम झाल्यास नेर तलावात चांगला पाणीसाठा होऊ शकतो 
येथून माणमध्ये पाणी नेणे शक्‍य, येरळा नदी प्रवाहित राहू शकते 
टेंभू योजनेतून तालुक्‍यातील पाचवड, विखळे, कलेढोणला पाणी मिळावे
पुसेगावात सुरू असलेल्या बटाटा संशोधन केंद्राच्या कामाला गती मिळावी
शेतीपंपांच्या रखडलेल्या वीज जोडण्या त्वरित द्या
अनेक ठिकाणचे ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त होण्याचे प्रकार 
 

कोरेगाव 
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खरीप हंगाम आतबट्ट्यात
खरीप घेवड्याचे उत्पन्न घटल्याने अर्थकारण प्रभावित
धोमच्या पाण्याअभावी बागायती उत्पन्नातही घट
गेल्या वर्षामध्ये सुमारे पाच कोटींचे नुकसान
फेब्रुवारीपासून ५० गावांत भेडसावते पाणीटंचाईची समस्या 
सुमारे दीड हजार वीजपंपांच्या जोडण्या दोन वर्षांपासून प्रलंबित 
(कोरेगाव उपविभाग - ७१०, वाठार स्टेशन 
उपविभाग - ५२८, रहिमतपूर उपविभाग - २५०)
 

जावळी
शंभरपेक्षा अधिक गावांत पाणीटंचाई
कण्हेर धरणाचा नाममात्र फायदा  
महू-हातगेघरचे काम ९० टक्के पूर्ण, दहा टक्के अपूर्ण 
पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर

फलटण 
फलटणमध्ये शासनाने पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरू करणे आवश्‍यक मिळत असलेला आठ तासांचा वीज पुरवठा अत्यंत मर्यादित असल्याने किमान दिवसा १२ तास वीजपुरवठा व्हावा
तालुक्‍यात ८४ गावे टंचाईग्रस्त जाहीर, सहा गावे व त्यावरील वाड्यावस्त्यांवर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा  
धोम-बलकवडीचे पाणी तालुक्‍यातील सर्व पाझर तलाव भरेपर्यंत सुरू ठेवणे गरजेचे 
धोम-बलकवडी कालव्याच्या अपूर्ण कामांना निधी देणे गरजेचे  
नीरा-देवघर कालव्याचे काम पूर्ण होण्यासाठी निधी उपलब्ध करून आगामी वर्षभरात कालव्याचे कामकाज पूर्ण होईल, या दृष्टीने नियोजन होणे अपेक्षित

सातारा 
तालुक्‍यातील उरमोडी धरणासाठी पुनर्वसित झालेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही
पाणी मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना कालव्याची कामे न झाल्याने पाणी मिळालेले नाही
तालुक्‍यातील बहुतांशी ठिकाणी फ्यूज बॉक्‍सची दुरवस्था
गेल्या तीन वर्षांपासून तालुक्‍यातील ११९१ वीजजोडण्या प्रलंबित
वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने शेतीपंप बंद पडत आहेत
 

माण 
जिहे-कटापूर योजना पूर्णत्वास जाण्याची गरज
उरमोडीची उर्वरित कामे लवकर व्हावीत
उरमोडीचे पाणी कायमस्वरूपी मिळावे
उरमोडीचे थकीत वीज बिल (३.३८ कोटी) माफ व्हावे
उरमोडीचे पाणी काहीही कारण न देता सोडावे
दुष्काळी पार्श्‍वभूमीवर स्थलांतरावर नियंत्रणासाठी औद्योगिकीकरण गरजेचे
प्रक्रिया उद्योग व शीतगृह बनविल्यास शेतकऱ्यांना मदत

महाबळेश्‍वर 
तालुका ईको सेन्सेटिव्ह झोन जाहीर झाल्याने सर्वच शासकीय कामकाज जटिल 
शासनाकडून अधिकृत परवानगी मागताना सामान्यांचे हाल 
अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ 
नियोजित वेण्णालेक पुलाचे काम परवानगीअभावी प्रलंबित 
सेंद्रिय शेतीअभावी मधमाश्‍यांना रोग, त्यांच्या वसाहती नष्ट होत असल्याने वनसंपदा धोक्‍यात
शेतीसाठी शेतमजूर मिळत नसल्याने शेतीऐवजी त्यांचा कल शेतघराकडे 
डोंगरी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीऐवजी इतर पिंकाच्या शेतीसाठी प्रोत्साहित करणे आवश्‍यक
पश्‍चिम भागातील नागरिकांची उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती

पाटण 
मोरणा-गुरेघर, मराठवाडी, उत्तर मांड, तारळी, निवकणे, चिटेघर व बिबी धरणांची आणि कालव्यांची कामे अपूर्ण 
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नांना निधी नाही
शेतीपंपांच्या जोडणीसाठी ट्रान्स्फॉर्मची आवश्‍यकता 
तारळी प्रकल्प लाभक्षेत्रात करण्यात आलेल्या शेती पाणीपुरवठा योजना बंदावस्थेत
सहा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा व ६० गावांत पाणीटंचाई
 

वाई 
कवठे-केंजळ योजनेसाठी निधी अपुरा
जललक्ष्मी योजनेचे काम संथ गतीने
नागेवाडी प्रकल्‍पाच्‍या कालव्‍यांची कामे पूर्ण करण्याची गरज
प्रलंबित शेतीपंपांच्‍या वीजजोडण्या मिळाव्‍यात

जिल्ह्यात १०,६७७ शेतीपंप वीजजोडण्या अद्याप बाकी

जिल्ह्यातील कृषिपंपांच्या जोडण्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. साधारण दहा हजार ६७७ शेतीपंप वीजजोडण्या बाकी असून, त्यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी आवश्‍यक आहे. 

विदर्भ व मराठवाडा विभागातील शेतीपंप वीज जोडणीचा विचार करता कोकणात ९५.३५ टक्के, उत्तर महाराष्ट्रात ३६.६९ टक्के, पश्‍चिम महाराष्ट्रात ८३.९७ टक्के इतक्‍या जोडण्या मार्च २०१५ च्या तुलनेत पूर्ण झाल्या आहेत.

विदर्भ व मराठवाडा विभागात १०२.३० टक्के इतके कृषिपंपांच्या वीजजोडण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित महाराष्ट्राचा विचार करता ६५.६६ टक्के इतक्‍या कृषिपंपांच्या जोडण्या झाल्या आहेत. विदर्भ व मराठवाड्याचा कृषिपंप वीज जोडणीचा अनुशेष संपला आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रलंबित जोडण्या पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

वर्षनिहाय प्रलंबित वीज जोडणीची माहिती अशी 
मार्च २०१३ पूर्वीची : ३१७

२०१३-१४ : ८१५
२०१४-१५ : २००७
२०१५-१६ : ३३२४
२०१६-१७ : ४२१४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com