Loksabha 2019 : सांगलीत दिलीप पाटील, अजितराव घोरपडे यांची नावे चर्चेत

Loksabha 2019 : सांगलीत दिलीप पाटील, अजितराव घोरपडे यांची नावे चर्चेत

सांगली - सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्यायची की नाही, याबाबतचा गुंता आजही सुटला नाही, मात्र ही जागा संघटनेला मिळालीच तर या जागेवर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील किंवा माजी मंत्री अजितराव घोरपडे या दोघांपैकी एका नावावर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. यापूर्वी भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांचेही नाव चर्चेत होते.

अर्थात आजच्या घडीला तरी स्वाभिमानीला जागा मिळाली तरी उमेदवार कोण याबाबत गोंधळ आहे. खासदार राजू शेट्टी यांच्याकडून होईल, मात्र त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सिग्नल महत्त्वाचा असेल. 

सांगलीतून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील वगळता चर्चेतील अन्य कोणीही नेता लढण्याच्या मानसिकतेत नव्हता. काँग्रेस श्रेष्ठींनी विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील यांना तुमच्यापैकी कोण लढणार हे स्पष्ट करा, असे सांगताच दोघांनीही आधीच हात झटकल्याने ही जागा आघाडीच्या वाट्यातून राष्ट्रवादीला घ्यावी असा पहिला प्रस्ताव होता. तशी चाचपणीही सुरू होती.

भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांत खासदार संजय पाटील व जिल्हा भाजपवर तोफगोळे टाकायला सुरवात केली होती.  त्यामागे राष्ट्रवादीतून रसद असल्याची चर्चा आहे. त्यांनी संजय पाटील यांना धूळ चारण्याची भाषा केली आहे,  मात्र राष्ट्रवादीच्या पसंतीत आता दिलीप पाटील यांच्या बाजूने आधीपासूनच तयारी झाली होती. महिनाभरापूर्वी जयंत पाटील यांनी तगडा उमेदवार देऊ असे भाकीत करताना सारा फोकस विश्‍वजित कदम यांच्यावर होता, अशी चर्चा होती. मात्र ते लढण्यास तयार नाहीत. त्यानंतर जयंतरावांचे प्राधान्य दिलीप पाटील व त्यापाठोपाठ अजितराव घोरपडे असल्याची चर्चा आहे.

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष म्हणून दिलीप पाटील यांनी काँग्रेसमधील विविध गटांशी गेल्या दोन वर्षांत चांगलेच जुळवून घेतले आहे. काँग्रेस नेत्यांच्या हाराकिरीमुळे आता ही जागा स्वाभिमानीला देण्याच्या हालाचाली वरिष्ठ  पातळीवरून सुरू झाल्या. जिल्ह्यात विरोधाचे वातावरण तयार झाले खरे; मात्र गेल्या महिन्यातच प्रदेशपातळीवरून  काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा राष्ट्रवादी किंवा स्वाभिमानीकडे दिली जाऊ शकते असे संकेत दिले होते. आता जागा जाणारच आहे तर मग काँग्रेसच्या मर्जीतील उमेदवार द्यावा अशीही सूचना आली. त्यासाठीही काँग्रेसमधील एका गटाकडून पडळकर यांच्या नावाचा आग्रह खासदार राजू शेट्टी यांच्याकडे धरला गेला, मात्र आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच  सांगलीत लक्ष घातले असून आता त्यांची पसंती दिलीप पाटील की अजितराव घोरपडे असतील याबाबत संभ्रम आहे. 

घोळ आणखी दोन दिवस?
स्वाभिमानीला आता सांगलीचाच अखेर पर्याय उरला आहे. स्वाभिमानीची पसंती बुलडाणा मतदारसंघाला आजही आहे, मात्र राष्ट्रवादीने राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी स्वाभिमानीने काँग्रेसपुढे आणखी एक पर्याय दिला आहे. त्यात काँग्रेसने आपल्या वाट्याची औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला देऊन त्या बदल्यात बुलडाण्याची जागा आपल्या कोट्यातून स्वाभिमानाला सोडावी, असा प्रस्ताव दिला आहे. यावर सांगलीच्या जागेचे भवितव्य ठरणार  आहे. काँग्रेसच्या प्रथेप्रमाणे हा घोळ आणखी दोन-तीन दिवस सुरू राहू शकतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com