Loksabha 2019: सांगलीत स्वाभिमानीचा उमेदवार कोण ?

Loksabha 2019:  सांगलीत स्वाभिमानीचा उमेदवार कोण ?

सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघाचा ‘चावर तिढा’ सोडवताना खासदार राजू शेट्टी यांनी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनाच लढवेल, असे जाहीर केले. काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांनी स्वाभिमानीकडून लढावे अशी थेट ऑफरही त्यांनी दिली. विशाल यांनी नकार दिला तर मात्र आम्हाला अन्य पर्याय निवडावा लागेल आणि त्याचा निर्णय त्वरित घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हे आहेत पर्याय
विशाल पाटील काय निर्णय घेतात, याकडे लक्ष ठेवताना स्वाभिमानीने अन्य पर्यायांवर चर्चा सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, क्रांती उद्योग समूहाचे नेते अरुण लाड आणि निवृत्त अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्यासह प्रसंगी गोपीचंद पडळकर असे पर्याय शेट्टींसमोर असतील.

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानीच्या वाट्याला दिला आहे. त्याची अधिकृत माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून दहा दिवसांपूर्वीच (काँग्रेस समितीला टाळे ठोकले त्या  दिवशी) राजू शेट्टी यांना देण्यात आली होती. परंतु, सांगलीतील परिस्थिती चिघळत निघाली होती. काँग्रेसला दुखावून जागा नको, अशी सावध भूमिका शेट्टींनी घेतली. त्यानंतर वातावरण निवळत असताना वसंतदादा समर्थक गटाने उचल खाल्ली आणि विशाल पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले. 

काँग्रेसची उमेदवार किंवा थेट बंडखोरी, असा पवित्रा घेत लोकसभा लढण्याचे जाहीर केले. त्यामुळे स्वाभिमानीची अभूतपूर्व कोंडी झाली  होती.  शेट्टींना अखेर सांगलीत येऊन ‘विचका झालेली सांगली मला नको’, असे जाहीर करावे लागले. पण, केवळ हातकणंगलेची एक जागा घेऊन तडजोड केल्यास ती त्रासाची ठरेल, याचा त्यांना पुरेपूर अंदाज होता. त्याची आज औदुंबर येथे झलकही पहायला मिळाली. त्यामुळे शेट्टींनी मुत्सद्देगिरी दाखवत विशाल पाटील यांच्यापुढेच स्वाभिमानीच्या उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला. 

काँग्रेसचे समन्वयक, आमदार सतेज पाटील यांनी या साऱ्या घडामोडीला अहवाल दिल्लीला पाठवून शेट्टींना  दोन दिवसांची मुदत मागितली होती. ती आज संपली. त्यामुळे शेट्टींनी काँग्रेसच्या निरोपाची वाट न पाहता सांगली लढण्याची घोषणा केली. आता विशाल पाटील यांनी उमेदवारी घ्यायची की नाही, हा विषय अद्याप  सुटलेला नाही. त्यावर दोन दिवसांत पडदा पडेल, अशी आशा खासदार राजू शेट्टी यांनी आज ‘सकाळ’ला सांगितले. 

‘‘विशाल पाटील यांनी स्वाभिमानीची उमेदवारी घेतली तर वसंतदादा गटावर अन्यायाचा विषय संपेल. शिवाय,  त्यांना काँग्रेसविरुद्ध बंड करावे लागणार नाही. कारण, स्वाभिमानी ही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा घटकपक्ष आहे. विशाल यांनी नकार दिल्यास आम्हाला अन्य पर्यायांवर विचार करावा लागेल. तीन लोकांशी संपर्क आहे.’’
- खासदार राजू शेट्टी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com