नगर - 'इथे कोणालाही पोपटपंची करू द्या; पण काहीही झाले तरी साकळाईचे काम करणारच. ज्यांनी दहा वर्षांत साठवण तलाव केला नाही, ते काय साकळाई योजना करणार,'' अशी टीका करून, विधानसभेच्या आधी योजनेच्या आराखड्याला मान्यता देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
नगर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ वाळकी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
"पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांच्या विजयाची खात्री झाली. तरीही केवळ "साकळाई'चा शब्द देण्यासाठी आलो आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, 'भाजप सरकारने "कुकडी'ला शासकीय फेरमान्यता देऊन तीन हजार कोटींचा निधी दिला. विरोधकांकडून "साकळाई'संदर्भात मनभेद करण्याचे काम सुरू आहे. इकडे येऊन म्हणायचे, "साकळाई झाली पाहिजे' आणि तिकडे जाऊन म्हणायचे, "तुमच्या हक्काचं पाणी घेऊन चालले.' मात्र, "साकळाई'मध्ये कोणाच्या हक्काचे पाणी जाणार नाही.
आपण उधारीचे काम करीत नाही. विधानसभा निवडणुकीआधी योजनेच्या आराखड्याला मान्यता देणार आहे. दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांना "वॉटरमॅन' म्हणून ओळखायचे. आता डॉ. सुजय यांचीही वॉटरमॅन म्हणून ओळख करायची आहे.''
|