विटा - यंत्रमागावर उत्पादित होणाऱ्या कापडावर उत्पादन खर्चापेक्षा एक ते दीड रुपये प्रतिमीटरला विक्रीचा दर कमी मिळत असल्याने विटा शहरातील यंत्रमाग व्यवसाय सलग दोन वर्षे नुकसानात आहे. त्यामुळे व्यवसाय बंद करून यंत्रमाग भंगारात घालण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. सव्वा लाख रुपये किमतीचा यंत्रमाग 25 रुपये किलोने काही व्यवसायिकांनी भंगारात घातले आहेत.
नुकसानाला कंटाळून इचलकरंजी, विटा, माधवनगर या ठिकाणच्या अनेक यंत्रमागधारकांनी यंत्रमाग व्यवसाय बंद केले आहेत. हे यंत्रमाग कोणी विकत घेत नसल्याने नाईलाजास्तव भंगारात घालावे लागत आहेत. त्यामुळे इचलकरंजीपाठोपाठ विटा येथील यंत्रमागधारकांनी यंत्रमाग भंगारात घालण्यास सुरवात केली आहे. येथील दोन प्रतिथयश व्यावसायिकांनी 70 यंत्रमाग नुकतेच भंगारात घातले आहेत. शहरात पाच हजार यंत्रमाग आहेत. या यंत्रमागावर दोन हजारांवर कामगार काम करत आहेत. सरकारच्या काही चुकीच्या धोरणांमुळे यंत्रमाग भंगारात घालण्याची वेळ आल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
शंभर वर्षांचा इतिहास असलेला हा यंत्रमाग व्यवसाय भंगारात जात असलेला पाहणे अत्यंत क्लेशदायक आहे. राज्य व केंद्र सरकारने या व्यवसायासाठी पूरक धोरणात्मक निर्णय घेऊन शेतीखालोखाल रोजगार देणारा हा व्यवसाय वाचविणे आवश्यक आहे.
- किरण तारळेकर, अध्यक्ष, विटा यंत्रमाग संघ.
नुकसानाची कारणे
* कापसाच्या वायदे बाजाराच्या समावेश
* नोटाबंदी व जीएसटीमुळे रोखीचे व्यवहार बंद
* सरकारकडून प्रादेशिक भेदभाव
* व्याज अनुदान व वीजदर सवलतीबाबत आश्वासन हवे
* सरकारच्या वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी नाही.
दृष्टिक्षेपात यंत्रमाग
800 कारखाने
पाच हजार यंत्रमाग
दोन हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कामगार
|