एका रात्रीत उभी राहिली मळवीवाडी गावठाण वसाहत

एका रात्रीत उभी राहिली मळवीवाडी गावठाण वसाहत

चंदगड - गेली साठ वर्षे लोकशाही मार्गाने मागणीचा पाठपुरावा करूनही शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने मळवीवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी बंडाचे निशाण फडकावत गावठाण हद्दीतील १८ एकरांमध्ये नियोजनबद्ध वसाहत उभारली आहे.

सामाजिक कार्यकर्ते आनंदराव कांबळे यांच्या नेतृत्वाने एका रात्रीत ९६ घरकुले, ८ रस्ते, २ मंदिरे, सार्वजनिक स्वच्छतागृह, क्रीडांगण आणि रंगमंच उभारण्यात आला आहे. नागरिकांनीच उद्या (ता. १७) या वसाहतीचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. 

लोकशाही पद्धतीने मागणी करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने आम्हाला बंडाचे निशाण फडकवावे लागले. न्याय्य हक्काकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष आणि नागरिकांचे अधिकार पाहता ही वसाहत नियमित करावी लागेल यात शंका नाही.
- आनंदराव कांबळे,
सामाजिक कार्यकर्ते.

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयासाठी १९६२ मध्ये मळवीवाडी गाव विस्थापित झाले. तुडये गावापासून तीन किलोमीटरवर शासनाने त्यांना घरे आणि गायरानसाठी जागा दिली; मात्र स्थानिक लोकांचे वर्चस्व आणि राजकारण यातून या ग्रामस्थांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. महसूल प्रशासनानेही त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्या वेळेपासून हे ग्रामस्थ आपल्या हक्कासाठी शासनाकडे लोकशाही मार्गाने पाठपुरावा करत आहेत.

दोन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी मळवीवाडी ते चंदगड असा सुमारे पन्नास किलोमीटर पदमोर्चा काढला. आबालवृद्धांनी सहभागी होऊन या प्रश्‍नाचे गांभीर्य शासनाकडे मांडले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही झाले; परंतु केवळ आश्‍वासनांची खैरात करण्यात आली. एका पिढीचे आयुष्य संपत आले तरी शासन संवेदनशीलपणे पाहत नसल्याने किमान आपल्या दुसऱ्या पिढीला तरी या प्रश्‍नाचे भोग भोगायला लागू नयेत, या विचाराने ग्रामस्थांनी बंडाचा निर्णय घेतला. आनंदराव कांबळे यांच्या नेतृत्वाने मुरारी मोहिते, रामलिंग पाटील, बंडू पाटील, मनोहर कणगुटकर, गणपत पाटील, शिवाजी पाटील, कमल पाटील आदींनी चर्चा केली. शासनानेच प्रस्तावित केलेल्या गट नंबरमध्ये वसाहत उभी करण्याचा निर्णय झाला.

२३ डिसेंबर २०१८ रोजी ग्रामस्थ एकत्र जमले. गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत बेळगावहून बांधकामासाठी लागणारे साहित्य आणण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही बाजूने गटार खोदाई करून आठ रस्ते तयार करण्यात आले. प्रत्येकी तीन गुंठ्याप्रमाणे जागा आखून संबंधितांनी बांधकामाला सुरवात केली. इलेक्‍ट्रिक प्रकाशझोतात रात्रभर काम सुरू होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत ९६ घरकुले, दोन देवालये, सार्वजनिक स्वच्छतागृह, क्रीडांगण आणि रंगमंच उभारण्यात आला. तुडये येथील दोन शेतकऱ्यांनी जमिनीची मालकी सांगत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला; परंतु तसे कागदोपत्री पुरावे नसल्याने आणि ग्रामस्थांची आक्रमकता बघून ते माघारी परतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com