कोल्हापूर : मुंबईत नऊ तारखेस होणाऱ्या मराठा क्रांती मूक महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो मराठा बांधवांनी केला. सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मुंबईला जाण्याची जय्यत तयारी झाली असून, उद्यापासून (ता. सात) मराठा बांधव मुंबईला रवाना होत आहेत.
कोपर्डी घटनेचा निषेध, मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मुंबईत हा मोर्चा होत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून मराठा बांधव मोर्चात सहभागी होत आहेत. कोल्हापुरातील मराठा बांधवांनी गेले महिनाभर या मोर्चाच्या जनजागृतीसाठी ठिकठिकाणी बैठका, मोटारसायकल फेरींचे आयोजन केले. तालुक्यात बैठक घेऊन मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचे गांभीर्य समजावून सांगितले. त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक तालुक्यातून मराठा बांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. चारचाकी वाहनांचे बुकिंग केले असून, कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मुंबईकडे जाणाऱ्या बांधवांसाठी एक आचारसंहिता तयार केली आहे. कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून विविध संघटनांच्या मराठा महिला रणरागिणी मुंबईला रवाना होणार आहेत. मोर्चासाठी युवक-युवतीही सहभागी होणार आहेत. लहान मुलांना सहभागी करण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील अनेकजण नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झाले आहेत. या नातेवाइकांकडे जिल्ह्यातील अनेक बांधव रवाना झाले आहेत. जे मराठा बांधव उद्या (ता. सात) व मंगळवारी (ता. आठ) मुंबईकडे चारचाकी वाहनांतून रवाना होणार आहेत, त्यांनी वाहनांवर मराठा क्रांती मूक महामोर्चाचे स्टिकर्स लावल्यास त्यांच्याकडून टोलनाक्यावर शुल्क आकारले जाणार नाही.
|