सोलापूर - कॉंग्रेस आघाडी सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला ज्या पद्धतीने निवडणुकीपूर्वी दोन महिने अगोदर आरक्षण दिले तसेच आरक्षण धनगर समाजालाही मिळण्याची शक्यता आहे. मराठा व मुस्लिम समाजाप्रमाणे धनगर समाजाची स्थिती करू नका. आपल्या सरकारची आणखी तीन वर्षे बाकी आहेत. आम्हाला निवडणुकीपूर्वी नको तर आताच आरक्षण हवे, अशी भूमिका माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी शनिवारी व्यक्त केली.
सोलापुरात आजपासून सुरू झालेल्या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात डांगे बोलत होते. निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण मिळाले की आदिवासी न्यायालयात जाणार, धनगर समाजाचे आरक्षण न्यायालयीन कचाट्यात अडकणार, परत काढा महामोर्चे. त्यापेक्षा राज्यातील धनगर समाजाला ताबडतोब आरक्षण मिळाले पाहिजे.
यशवंतराव चव्हाण यांच्या "यशवंत नीती'मुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाला आरक्षण मिळाले नसल्याचाही दाखला डांगे यांनी दिला. आदिवासी समाजाचे देशात 54 खासदार आहेत, महाराष्ट्रात भाजपचे 19, राष्ट्रवादीचे चार व कॉंग्रेसचा एक आमदार आहे. धनगरांना आरक्षण देऊ नये म्हणून राज्य सरकारवर दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यात 28 लाख धनगर समाज
2011 ची जातीय जनगणना जाहीर झाली नाही, परंतु सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी राज्यातील धनगर समाजाच्या लोकसंख्येची आकडेवारी मला दिली. त्यामध्ये राज्यात फक्त 28 लाख धनगर समाज असल्याचे समोर आले आहे. धनगर समाजातील आहेर, दंगे यांसह अनेक पोटजातींमधील लोक त्यांच्या नावापुढे धनगर समाजाचा उल्लेख करत नाहीत. ते स्वत:ला धनगर म्हणवून घेण्यास कमीपणा समजत असल्याची खंतही डांगे यांनी व्यक्त केली.
|