महिला सुरक्षा समित्या कागदावरच!

Sandip-and-Vidyatai
Sandip-and-Vidyatai

जिल्ह्यात ३३२ समित्या कार्यरत; एक हजार ४०७ गावे अद्याप कोसो दूरच  
कऱ्हाड - जिल्ह्यातील महिला सुरक्षा समितीचे काम अद्यापही कागदावरच आहे. जिल्ह्यातील एक हजार ७३९ गावांपैकी केवळ ३६० गावांतच समित्यांची स्थापना झाली. त्यातील २८ समित्या बंद आहेत. जिल्ह्यातील अद्यापही एक हजार ४०७ गावांमध्ये त्या समित्या स्थापण्याच्या काहीच हालचाली झालेल्या दिसत नाहीत. तळबीड पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी महिला असूनही त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकही समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या महिला सुरक्षा समितीच्या ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ला जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतून वाटाण्याच्या अक्षताच दाखवल्याचे या निमित्ताने स्पष्ट होते आहे. 

महिलांना त्यांच्यावर होणारे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार करण्यासाठी किंवा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वंतत्र व्यासपीठ असावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत गावात एक महिला सुरक्षा समिती नेमण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले होते. मात्र, श्री. पाटील यांच्या या ड्रीम प्रोजेक्‍टच्या आदेशाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील २९ पोलिस ठाण्यांतून केवळ ३३२ महिला सुरक्षा समित्यांची स्थापना झाली आहे. 

त्यामध्ये जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त पोलिस ठाणी अशी आहेत, जेथे केवळ पाच किंवा त्याही पेक्षा कमी महिला सुरक्षा समित्यांची स्थापना झालेली आहे. चार पोलिस ठाण्यांतील सुमारे २८ समित्या बंद आहेत. त्या समित्या स्थापना झाल्या आहेत. मात्र, त्यांचे कामच नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे महिला सुरक्षा समित्यांची घोषणा हवेतच विरणारी दिसते आहे. जिल्ह्यात एक हजार ७३९ गावे आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाखांच्या आसपास आहे. जिल्ह्यात २९ पोलिस ठाणी आहेत.

त्यामुळे महिला सुरक्षा समितीचे काम मोठ्या प्रमाणात व्हावे, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यापद्धतीने काम झालेले नाही. जिल्ह्यातील सुमारे एक हजार ४०७ गावांमध्ये समित्याच नाहीत. तर चार पोलिस ठाण्यात २८ समित्यांचे काम बंद आहे. अवघ्या सहा पोलिस ठाण्यांत २५ पेक्षा जास्त समित्या आहेत. त्यामुळे महिला सुरक्षा समित्यांचा प्रोजेक्‍ट केवळ कागदावरच रंगल्याचे दिसते. 

समित्यांतील टॉप पोलिस ठाण्यांत सातारा तालुका (३४),  पाटण (३२),  रहिमतपूर (३०), कऱ्हाड शहर (२५), कऱ्हाड तालुका (२५) व   शिरवळ (२५) यांचा समावेश आहे. कार्यक्षेत्र मोठे मात्र समित्या कमी असलेल्या पोलिस ठाण्यांत कोयनानगर, पाचगणी व औंध (प्रत्येकी एक),  महाबळेश्वर (दोन), सातारा शहर, शाहूपुरी, उंब्रज, पुसेगाव व दहिवडी (प्रत्येकी चार), फलटण शहर (सहा) व फलटण तालुका (पाच) यांचा समावेश आहे. 

तळबीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकही महिला सुरक्षा समिती नाही. उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थापन झालेल्या १४ समित्यांपैकी दहा समित्यांचे काम बंद झाले आहे. भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थापन झालेल्या २० पैकी दहा समित्यांचे काम बंद झाले आहे. मेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थापन झालेल्या २३ पैकी तीन समित्यांचे काम बंद झाले आहे. लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थापन झालेल्या १२ पैकी पाच समित्यांचे काम बंद झाले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती स्थापन झाली पाहिजे, असे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांत समित्या स्थापन झाल्या. काही ठिकाणी काम सुरू आहे. सात दिवसांमध्ये प्रत्येक पोलिस ठाण्याने महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्याचे काम पूर्ण न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- संदीप पाटील, पोलिस अधीक्षक, सातारा 

तालुक्‍यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावात महिला सुरक्षा समिती स्थापन झालीच पाहिजे. त्यात कार्यक्षम महिलांचा सहभाग करून घेतला पाहिजे. समितीची बैठक होवून येणाऱ्या अडचणींची चर्चा होऊन त्यावर उपायांची अंमलबजावणी झाली पाहिजे. ‘सकाळ’च्या तनिष्का सभासदांनाही त्या समितीत स्थान दिले पाहिजे. 
- विद्याताई थोरवडे, तनिष्का सदस्या, मलकापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com