करकंब - महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरणाने आता पहिलीपासून शिकविल्या जाणाऱ्या मराठी भाषेतील वर्णमाला आणि बाराखडीमध्ये बदल केला असून आता इथून पुढे विद्यार्थ्यांना बाराखडी ऐवजी चौदाखडी शिकावी लागणार आहे.
इयत्ता पहिली ते पाचवीतील काही विद्यार्थ्यांना अजून वाचता येत नाही हे वास्तव लक्षात घेवून विद्यापरीषदेने तीन महिन्यात शंभर टक्के विद्यार्थ्यांना वाचनाची हमी देणारा 'मूलभूत वाचन क्षमता विकास कृती कार्यक्रम' तयार केला आहे. त्याचे पहिल्या टप्प्यातील तीन दिवसांचे प्रशिक्षण नुकतेच पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत प्राथमिक शिक्षकांना देण्यात आले. यामध्ये बाराखडीमध्ये करण्यात आलेला बदल प्राथमिक शिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. यापूर्वीच्या अ ते औ या स्वरमालिकेत आता 'ऍ' व 'ऑ' हे दोन स्वर नव्याने वाढविण्यात आले आहेत. आता नविन रचनेनुसार ए नंतर ऐ ऐवजी 'ऍ' तर ओ नंतर येणाऱ्या औ ऐवजी 'ऑ' हे नविन स्वर समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन वाढीव स्वरांमुळे आता विद्यार्थ्यांना बाराखडी ऐवजी चौदाखडी शिकावी लागणार आहे.
पंढरपूरच्या गटशिक्षण अधिकारी सुलभा वटारे यांनी 'संगणक आणि मोबाईलच्या वाढत्या प्रमाणामुळे व बदलणाऱ्या दैनंदिन जीवनामुळे गॅस, गॅलरी, बॅट, बॉल, डॉक्टर, कॉम्प्युटर, यासारखे 'ऍ' आणि 'ऑ' उच्चार असणारे अनेक शब्द आपल्या बोलीभाषेत रुढ होत आहेत. हे शब्द विद्यार्थ्यांना अचून वाचता व लिहिता यावे यासाठी आता काळाची गरज म्हणून हे नवीन दोन स्वर मराठी वर्णमालेत समाविष्ठ करण्यात आले आहेत. इथून पुढे बाराखडी ऐवजी चौदाखडी आत्मसात करावी लागेल,' अशी माहिती व्यक्त केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.