श्रीरामपूर : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या असिस्टंट पदी नियुक्ती झालेल्या अनिरुद्ध देसाई यांनी केले.
तालुक्यातील शिरसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांना १० वी व १२ वी नंतर पुढे काय यासाठी आयोजित "नवी दिशा, नवी आशा" या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
देसाई म्हणाले, ''माणसाची परिस्थिती कधीच शिक्षणाच्या आड येत नाही. मीसुध्दा एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असुन पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता घेता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असे. या स्पर्धा परीक्षा देताना मला दोन वेळा अपयशदेखील आले; तरीही मी जिद्द सोडली नाही. पुन्हा नव्या जोमाने व नव्या उमेदीने प्रयत्न केल्याने आज माझी आर. बी. आय. च्या असिस्टंटपदी नियुक्ती झाली. परिस्थिती कधीच यशाच्या आड येत नसते. त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी ठेवा आपण ग्रामीण असल्याचा न्यूनगंड काढून टाका .आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हुशार मुलांसाठी अनेक दालने खुली आहेत, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार देवीदास देसाई होते. यावेळी रज्जाक पठाण, माजी उपसरपंच बबनराव गवारे उपस्थित होते.
या व्याख्यानमालेच्या दुसर्या भागात नगर येथील "नवभारत प्रोफेशनल अकॅडमी"चे संचालक भरत झवर यांनी विविध अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. आपले ध्येय निश्चित करून अधिकाधिक महत्वाकांक्षी बनावे. कोणत्याही स्पर्धा परीक्षांना न डगमगता मन एकाग्र करुन अभ्यास करुन परीक्षा दिल्यास यश निश्चित मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेन्द्र वधवाणी सर यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.