नगर - 'जे काम हाती घेतले, त्यात निश्चित यश मिळते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम यांच्या सहमतीने राम मंदिराच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल,'' असा विश्वास "आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी आज येथे व्यक्त केला.
साधकांशी संवाद साधताना त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना ही भूमिका मांडली. ते म्हणाले, 'निर्मोही आखाड्याचे ज्येष्ठ महात्मा रामचंद्रजी एकदा माझ्याकडे आले आणि त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची साद घातली. त्यांची तळमळ लक्षात घेऊन हे काम पुन्हा हाती घेण्याचे ठरविले. हे प्रकरण न्यायालयात आहे; पण न्यायालयातील निकाल कोणा एकाच्या बाजूने लागेल. यातून मने जुळणार नाहीत. राम मंदिर उभारताना ते सर्वांच्याच सहयोगातून उभारले जावे, ही प्रत्येकाची भावना आहे. विशेष म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाजांमध्येही अशी भावना असणारे खूप मोठ्या संख्येने आहेत. न्यायालयानेही हा प्रश्न न्यायालयाबाहेर सामोपचाराने सोडविण्याबाबत सांगितलेले आहे.''
रविशंकर म्हणाले, 'गेल्या काही दिवसांत मी पाचशेपेक्षा अधिक इमामांशी या बाबतीत चर्चा केली आहे. वादग्रस्त जागा असल्यास तेथे केलेले नमाजपठण कबूल होत नाही, असे इस्लाममध्ये सांगितले आहे. त्यामुळे हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्याच्या दिशेने कल आहे. यावर सुचविलेल्या तोडग्यांना मान्यता मिळत असून, सुन्नी वक्फ बोर्डानेही यास मान्यता दिली आहे. ''
|