साखर कारखान्यांकडे 13,932 कोटींची थकबाकी 

साखर कारखान्यांकडे 13,932 कोटींची थकबाकी 

माळीनगर - एकीकडे देशात चालू हंगामात साखरेचे जादा उत्पादन होत असताना, दुसरीकडे साखरेच्या भावात घसरण चालूच आहे. परिणामी, शेतकऱ्यांना देय असलेल्या उसाच्या थकबाकीत वाढ होत आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) मते, देशाच्या विविध राज्यांत मिळून यंदाच्या गळीत हंगामात जानेवारीअखेर 13 हजार 932 कोटी रुपये उसाची थकबाकी साखर कारखान्यांकडे आहे. 

ऊसदर नियंत्रण कायदा 1966 नुसार, उसाचे गाळप झाल्यानंतर 14 दिवसांत त्या उसाचे बिल शेतकऱ्यांना अदा न झाल्यास ती रक्कम थकबाकी समजली जाते. 14 दिवसांत शेतकऱ्यांना ऊसबिले न दिल्यास त्यानंतर त्या रकमेवर वार्षिक 15 टक्‍क्‍यांप्रमाणे व्याज आकारण्याची तरतूद त्यात आहे. "इस्मा'ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडे उसाची सर्वाधिक 5553 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यानंतर कर्नाटकात 2714 कोटी व महाराष्ट्रातील कारखान्यांकडे 2636 कोटी रुपयांची थकबाकी आहे. 

"इस्मा'च्या मते, यंदा देशातील साखर उत्पादन 271 लाख टनांपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत ते 33 टक्‍क्‍यांनी अधिक असेल. केंद्राने साखर आयातीवरील शुल्क शंभर टक्के केल्याने व विक्रीवर मर्यादा घातल्याने घाऊक बाजारातील साखरेच्या किमतीत थोडीफार सुधारणा झाली आहे. मात्र, साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांपुढील अडचणी कायम आहेत. 

केंद्राच्या निर्णयामुळे साखरेचे भाव वाढले व पुन्हा कमी झाले. विक्रीवरील बंधनामुळे सध्या बाजारात पुरेशी साखर नाही. कारखान्यांनी भाव कमी करून साखर विक्रीस काढली, तरी व्यापारी ती उचलत नाहीत. ते सध्या साठवलेल्या साखरेची विक्री करीत असून, कारखान्यांकडील साखरेची विक्री न झाल्यास ती उघड्यावर ठेवण्याची वेळ कारखान्यांवर येणार आहे. 
- राजेंद्र गिरमे, व्यवस्थापकीय संचालक, दि सासवड माळी शुगर फॅक्‍टरी, माळीनगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com