शेतकऱ्यांना बदनाम कराल, तर ढोपरापासून कोपरापर्यंत फोडू : आमदार बच्चू कडू

शेतकऱ्यांना बदनाम कराल, तर ढोपरापासून कोपरापर्यंत फोडू : आमदार बच्चूभाऊ कडू
शेतकऱ्यांना बदनाम कराल, तर ढोपरापासून कोपरापर्यंत फोडू : आमदार बच्चूभाऊ कडू

तळेगाव दिघे (जि. नगर ) - केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे काम करत आहे. जर शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देण्याचा किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तर त्यास ढोपरापासून कोपरापर्यंत फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे नेते तथा सुकाणू समितीचे सदस्य आ. बच्चूभाऊ कडू यांनी सरकारला दिला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय सुकाणू समितीचा लढा थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कर्जमाफीसाठी नाशिक येथून निघालेल्या सुकाणू समितीच्या जनजागरण यात्रेत संगमनेर येथे आ. कडू बोलत होते. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील, किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, सरचिटणीस डॉ. अजित नवले, बळीराजा संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, नामदेव गावडे, भूमिपुत्र संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अनिल देठे, करण गायकर, गणेश जगताप, मोहन देशमुख सुशीला, मोहरे, महेश नवले, रावसाहेब डुबे उपस्थित होते

आ. कडू म्हणाले, सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही, तर कर्ज वसुली सुरु केली. सरकारची कर्जमाफीची योजना फसवी आहे. आपल्याला संपूर्ण सातबारा कोरा करायचा आहे. त्यासाठी जनजागरण यात्रा सुरु केली आहे. या लढाईत तुम्ही आम्ही शेतकरी म्हणून एकत्र आलो, तरच आपण कर्ज मुक्तीची लढाई जिंकू. यासाठी जेव्हा सुकाणू समिती आपल्याला हाक देईल तेव्हा सर्व शेतकऱयांनी या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

रघुनाथ दादा पाटील म्हणाले, सरकारने सावकाराचे कर्ज माफ केले, परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. सरकारच्या वेगवेगळ्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आपल्याला हा लढा थांबवायचा नाही. सर्व शेतकऱ्यांनी सुकाणू समितीच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
 डॉ. अजित नवले म्हणाले, सरकारने सुकाणू समितीने कर्जमाफी करताना जमिनीची थकीत व बिगर थकीत आशा दोन अटी  घालण्यात आल्या होत्या. सरकारने त्या अटी मान्य केल्यामुळे आम्ही शेतकरी संपाचे आंदोलन मागे घेतले. अवघ्यां दोन दिवसात सरकारने शब्द फिरविलला त्यामुळे हा लढा पुन्हा सुरु झाला आहे. जनजागरण यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फिरून शेतकऱ्यांनी मते जाणून घेणार आहे. सरकारने थकीत बिगर थकीत तसेच प्रामाणिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय लढा थांबणार नसल्याचे सांगत दि. २३ जुलै रोजी पुण्यात जनजागरण यात्रेची सांगता होणार असल्याने शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com