आटपाडीत दुष्काळाला आमदार जबाबदार असल्याचा बळीराजा संघटनेचा आरोप

आटपाडीत दुष्काळाला आमदार जबाबदार असल्याचा बळीराजा संघटनेचा आरोप

सांगली - आटपाडी तालुक्‍यातील दुष्काळाची दाहकता वाढण्यास आमदारच जबाबदार असल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील आणि जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. आटपाडी पंचायत समितीच्या आमसभेसाठी सांगलीतील स्टेशन चौकात १३ मे रोजी धरणे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. 

गेल्या चार वर्षांत आमदारांनी पंचायत समितीच्या आमसभा धुडकावून लावल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात आली.

ते म्हणाले, ‘‘आटपाडी तालुक्‍यात पाणीप्रश्न गंभीर आहे. सिंचन योजनांच्या काही प्रमाणात काम झाले असले, तरी बहुतांशी काम अपूर्ण आहे. त्यामुळे तालुक्‍याला कायमस्वरूपी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असताना आमदार बाबर यांनी तालुक्‍यातील एकाही दुष्काळी गावाला भेट दिली नाही.

आटपाडीतील दुष्काळाबाबत त्यांना कोणतेही गांभीर्य नाही. त्यामुळेच तालुक्‍यातील दुष्काळाची दाहकता कायम राहिले आहे. आमदार या नात्याने त्यांनी पंचायत समितीमध्ये आमसभा घेणे आवश्‍यक होते, मात्र गेल्या चार वर्षांत एकही आमसभा घेतलेली नाही. आटपाडी तालुक्‍यावर जाणीवपूर्वक राजकारण करीत आहेत. त्यामुळे तेथील पाण्याचा प्रश्न कायम राहिला. काही गुंड पळून लोकांच्यावर दडपशाही करत आहेत.’’

बळीराजा संघटनेने आटपाडी पंचायत समिती आमसभेसाठी  सांगलीमधील स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ १३ मे रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष डॉ. देशमुख यांनी सांगितले.

तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, कार्याध्यक्ष जयंत गायकवाड, शहाजी गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com