समाजाच्या भल्यासाठी जागरूक राहूया - मोहन भागवत

समाजाच्या भल्यासाठी जागरूक राहूया - मोहन भागवत

कोल्हापूर - ‘‘जो विचार समाजाला सोबत घेऊन साऱ्यांच्या भल्याचा विचार करतो, तोच धर्म असतो. आपण वैयक्तिक पातळीवर याच सत्यावर आधारित धर्माने वागले पाहिजे आणि या मार्गानेच पुढची वाटचाल करणाऱ्यांना बळ देण्यासाठी प्रत्येकाने जागरूक असायला हवे,’’ असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज येथे केले.

श्री सिद्धगिरी कणेरी मठावर कोजागिरी पोर्णिमेनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, मठावरील प्रेरणा पार्क उद्यानात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

सुमारे अर्ध्या तासाच्या संवादात श्री. भागवत यांनी देव, देश, धर्म, एकूण वर्तमान आणि भविष्याविषयीचा सर्वांगीण वेध घेतला. ते म्हणाले, ‘‘भारतात देव आणि देश वेगवेगळे असूच शकत नाहीत. कारण भारत हा देश अध्यात्माचे प्रयोजन असलेला देश आहे. जेथे पहाल तेथे देव आहे आणि ज्यांनी पहायचा प्रयत्न केला नाही त्यांना तो कधीच दिसणार नाही. देव असल्याची प्रचिती येण्यासाठी मात्र साधना महत्त्वाची ठरते. आत्मसाधना आणि सेवा परोपकार हे त्याचे पैलू आहेत.’’

समाजातील एकोपा एकसंध ठेवत साऱ्यांच्या भल्यासाठी सत्याच्या मार्गाने चालत जायला हवे. भारतात एखादा रिक्षावाला रस्त्याच्या कडेला रिक्षा लावून निवांत झोपला तरी त्याला झोप लागू शकते. मात्र, पाश्‍चिमात्य देशात झोपेसाठी गोळ्या घ्याव्या लागतात. त्यांच्याकडे सुविधा आहेत आणि आपल्याकडे सुख, समाधान, शांती आहे. देशाला येत्या काळात याच दृष्टीने आपल्याला सर्वश्रेष्ठ व्हायचं आहे. दुसऱ्यांवर अधिकार गाजवण्याची महासत्ता अपेक्षित नसल्याचेही त्यांनी सांगितले.  
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह भागैय्याजी यांनी कणेरी मठावरील विविध उपक्रम म्हणजेच एक संस्कार असल्याचे सांगितले. अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी प्रास्ताविक केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ग्रामविकास राष्ट्रीय प्रमुख डॉ. दिनेशजी, बसंतकुमारजी, कौशल्येंद्रसिंग, योगेश प्रभू आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमापूर्वी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या चित्रफितींमुळे एकूणच कार्यक्रमाला राष्ट्रप्रेमाने भारावून टाकले.   

श्री. भागवत म्हणाले..

  •     देशात कुटुंब व्यवस्था महत्त्वाचा घटक असून कुटुंबातून निर्माण होणारा संस्कार पुढे समाजावर होत असतो.
  •     एकेक कुटुंब स्वातंत्र्यलढ्यात उतरले आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळाले. 
  •     स्वातंत्र्यलढ्याची लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही प्रेरणास्थाने होती आणि त्यांनीही देवाचे नामस्मरण करीतच लढा नेटाने पुढे नेला.
  •     देशात चांगले काम करणारे अनेक आहेत. त्यांच्या कामाला जमेल तेवढे बळ द्यायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com