सांगली - सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे यांचा पराभव हा आमचाच असून, त्याचे मनस्वी दुःख होत असल्याची खंत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. कवलापूर येथे किल्ले पन्हाळगडाच्या प्रतिकृतीच्या उद्घाटनासाठी ते आले होते. या वेळी संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान, लोकसभा निवडणूकीत उदयनराजे राष्ट्रवादीमधून निवडूण आले होते. पण त्यांनी अवघ्या तीन महिन्यातच राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे येथे पुन्हा पोटनिवडणूक लागली. भाजपतर्फे लढताना उदयनराजे यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘‘उदयनराजे यांचा पराभव त्यांचा बंधू नावाने आमचाच पराभव आहे. छत्रपती घराण्याला सुख-दुःख बघण्याची सवय आहे. दुःख आले तरी तो पराजय विजयाच्या दिशेने कसा नेता येईल, याचे त्यांच्याकडे नियोजन असेल. मला खात्री आहे, उदयनराजे त्यातून बाहेर पडतील.’’
राज्य मंत्रिमंडळाची वर्षातील एक बैठक रायगडावर व्हावी, असा निर्णय नव्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
खासदार संभाजीराजे म्हणाले,‘‘शिवरायांनी स्वराज्य निर्मिती कुणासाठी केली हे आजही सामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी शिवरायांची राजधानी रायगडावर बैठक व्हायला हवी. हे राज्य पुढे न्यायचे असेल तर शिवरायांच्या स्वराज्याचा अर्थ समजायचा असेल तर तिथे बैठक होणे गरजेचे आहे. दहा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने शंभर कोटी दिले आहेत. त्याचा या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी फायदा होणार आहे.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.