'शेतीमालाला योग्य भावासाठी प्रयत्नशील '

sadhabau-khot-satara
sadhabau-khot-satara

सातारा - मुंबई- गोहाटी एक्‍स्प्रेसला शेतीमाल नेण्यासाठी राष्ट्रीय किसान बझार नावाचा स्वतंत्र डबा जोडून त्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतीमाल आसामच्या बाजारपेठेत पाठविणे आणि शेतीमाल विक्रीसाठी आसाममध्ये पणन मंडळाचे स्वतंत्र कार्यालयही सुरू केले जाणार आहे. जेणेकरून शेतीमालाला चांगला भाव मिळेल, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. 

जिल्हा बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात श्री. खोत यांचा जिल्ह्याच्या वतीने नागरी सत्कार झाला. त्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, संजय भगत, अर्जुन साळुंखे, युवा संघटनेचे धनंजय महामुलकर, ज्ञानदेव कदम, डॉ. दिलीप येळगावकर, सदाशिवराव सपकाळ, हणमंत चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. खोत म्हणाले, ""यशवंतराव चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यात सहकार वाढविला. या सहकाराच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध झाला. या जिल्ह्याने चळवळीतून राजकारणाच्या पटलावर मला जन्माला घातले. आता मंत्रिपदाच्या माध्यमातून या जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे. भारत निर्माण आणि पेयजलमधील गैरव्यवहार आता बाहेर काढायचे आहेत. त्या वेळची पाणी समिती, अधिकारी व ठेकेदार यापैकी कोणाचीही गय केली जाणार नाही.'' 

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जिल्ह्यातील प्रत्येक मंडलात महाआरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल. यातून तपासणी होऊन गंभीर आजार असलेल्यांवर पुण्या- मुंबईतील रुग्णालयांत मोफत उपचार केले जातील. मागील सरकारने "पाणी अडवा आणि पाणी जिरवा'तून मोठ्या प्रमाणात पैसा जिरविला; पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याचा थेंब न्‌ थेंब अडविला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी तानाजी देशमुख, अमोल खराडे, रवींद्र घाडगे, सचिन नलवडे, देवानंद पाटील, संजय साबळे, जीवन शिर्के, नितीन यादव, सूर्यकांत भुजबळ, संजय कदम, प्रमोद जाधव, सचिन खानविलकर यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते. 

सातारा, मुंबई बाजार समितीची चौकशी 
सातारा बाजार समितीत एफएसआय गिळंकृत करण्याचा प्रकार झाला आहे. याची चौकशी सुरू असून, या सर्व प्रकारास जबाबदार संचालकांसह अधिकाऱ्यांना बेड्या घालण्याची तयारी आम्ही केली आहे. त्याबरोबरच मुंबई बाजार समितीची चौकशी अंतिम टप्प्यात असून, त्यात "मी' म्हणणाऱ्यांनाही तुरुंगाची हवा खावी लागणार आहे, असेही श्री. खोत यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com