नगर : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील वर्दळीच्या भागात आज कारवाई करत 300 अतिक्रमणे काढली. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा आज चौथा दिवस होता.
अतिक्रमण पथक पाहताच रस्त्याच्या कडेला असलेल्या काही अतिक्रमणधारकांनी टपऱ्या उचलून खासगी जागेत ठेवल्या. अशा टपरीधारकांवर कारवाई न झाल्याने महापालिका प्रशासनाची कारवाई फार्स ठरत असल्याची चर्चा नगरमध्ये सुरू होती.
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने 20 दिवसांची अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आज 300 अतिक्रमणे काढण्यात आली. मात्र, गेली तीन दिवसात केलेली अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत.
आज सकाळी दहा वाजता दोन वाहने, एक जेसीबीसह 30 कर्मचाऱ्यांचे पथक कोठला परिसरात आले. त्यांच्या समवेत तोफखाना पोलिसांचेही पथक होते. हे पथक पाहताच कोठला परिसरात रस्त्यावर असलेल्या टपऱ्या अतिक्रमणधारकांनी चटकन उचलून राज चेंबरच्या भिंतीच्या आत लावले.
खासगी जागेत असलेल्या या टपऱ्यांवर महापालिका प्रशासन कारवाई करू शकले नाही. हीच पद्धती शहरातील अनेक भागांत राबविण्यास सुरवात झाली आहे. आज या पथकाने कोठला, मंगल गेट, कोंड्यामामा चौक, जे. जे. गल्ली, सर्जेपुरा चौक, तेलीखुंट चौक, नेता सुभाष चौक, चितळे रस्ता, नेहरू मार्केट, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट, नेप्ती चौक येथील अतिक्रमणे काढली. या कारवाईत तीन गाड्या अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आले.
नगरसेवक गणेश कवडे यांनी नेप्ती चौकातील अतिक्रमण काढण्याची मागणी स्थायी समितीच्या सभेत केली होती. त्यानुसार नेप्ती चौक ते सीना नदी पुलादरम्यानची ही अतिक्रमणे काढण्यात आली. दुपारी तीननंतर हेच पथक पुन्हा उलट्या दिशेने कोठला परिसरापर्यंत आले.
फेरीवाल्यांची शक्कल
अतिक्रमणविरोधी पथक दिसताच फेरीवाले आपली वाहने तेथून हलवितात. पथक पुढे गेल्यावर फिरून पुन्हा हे फेरीवाले रस्त्याच्या कडेला उभे राहत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पथकालाही यावर कारवाई कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
|