वशिल्याचे तट्टू जिल्ह्याबाहेर!

वशिल्याचे तट्टू जिल्ह्याबाहेर!

पालिकांतील १४ जणांवर गंडांतर; नऊ जणांना नोकरीत बदली माहीतही नाही! 
सातारा - एकाच जागेवर वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या नगरपालिकांतील वशिल्याच्या तट्टूंना ‘डीएमए’ने जिल्ह्याबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या या निर्देशांमुळे राज्य संवर्गात असलेल्या जिल्ह्यातील काही जणांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यातील असे १४ पालिका अधिकारी-कर्मचारी शासनाच्या निर्णयाने बाधित होण्याची शक्‍यता आहे. यापैकी नऊ जणांना नोकरी लागल्यापासून बदली म्हणजे काय, हे माहीतही नाही! ‘डीएमए’ने यावेळी कोणताही वशिला अथवा राजकीय हस्तक्षेप चालणार नसल्याची तंबीही दिली आहे. 

नगरपालिका अथवा नगरपंचायतीच्या सेवेत रुजू झाल्यापासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्या राज्य संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण शासनाने अवलंबले आहे. पूर्वी विशिष्ट श्रेणी, अ, ब आणि क या चारही श्रेणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार विविध स्तरावर विखुरले होते. क श्रेणीबाबत पूर्वी जिल्हाधिकारी स्तरावर तर ब श्रेणीबाबत विभागीय आयुक्त स्तरावर निर्णय होत होते. आता सर्व श्रेण्यांतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार आयुक्त तथा नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक यांच्याकडे देण्यात आले आहेत.

त्यामुळे यावेळी बदल्यांच्या निर्णयात कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.

नव्या धोरणानुसार राज्यस्तरीय संवर्गात कार्यरत असलेले कर्मचारी संपूर्ण राज्यात बदलीस पात्र ठरविण्यात आले आहेत. एका नगरपालिकेत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्यांची बदली करण्यात येणार आहे. ठराविक परिस्थितीत एक वर्षाची सवलत मिळत असे. तथापि, कोणत्याही स्थितीत चार वर्षांपेक्षा अधिक काळ एका नगरपालिकेत अथवा नगरपंचायतीत कर्मचाऱ्याला थांबता येणार नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच जिल्ह्यात सहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहणाऱ्या अधिकाऱ्यांना आता जिल्ह्याबाहेर बदली स्वीकारावी लागणार आहे.

बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने बदलीच्या ठिकाणांचे पर्यायही दिले आहेत. एका जागेवर तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या तथापि, सहा वर्षांपेक्षा कमी कार्यकाळ झालेल्या कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी त्याच जिल्ह्यातील तीन नगरपालिकांचे पर्याय घेण्यात आले आहेत. एकाच जिल्ह्यात सहा वर्षांपेक्षा अधिक काळ तळ ठोकून असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मात्र, जिल्ह्याबाहेरील तीन जिल्ह्यांत, प्रत्येकी तीन नगरपालिकांचे पर्याय घेण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील पालिकांतील १४ कर्मचारी बदलीच्या धोरणास पात्र ठरण्याची शक्‍यता आहे. वाईमधील तीन तर कऱ्हाड, सातारा व फलटण या पालिकांतील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांनी नोकरीस लागल्यापासून बदली हा प्रकार पाहिला नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून समजते.

दामले, वणवे व खटावकरांची बदली शक्‍य
सातारा पालिकेत करवसुली आणि अशा विविध विभागांचे प्रमुखपद स्वत:कडे ठेवणारे अरविंद दामले राज्य संवर्गात समावेश झाल्यापासून सातारा पालिकेत कार्यरत आहेत. सहायक कर निर्धारण अधिकारी अंबादास वणवे व शाहू कलामंदिर नाट्यगृहाचे व्यवस्थापक प्रशांत खटावकर यांचा तीन वर्षांचा साताऱ्यातील कार्यकाळ पूर्ण झाला आहे. हे दोघेही जिल्ह्यांतर्गत बदलून जाऊ शकतात. आस्थापना विभागप्रमुख राजेश काळे एक वर्षांपूर्वी रुजू झाले आहेत. मात्र, त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण असल्याने प्रतीक्षा यादीत त्यांचा समावेश आहे. या यादीवरील कर्मचाऱ्यांबाबत स्वतंत्र विचार होऊ शकतो, असे वरिष्ठ सूत्रांकडून समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com