विद्यार्थीनीचा खून प्रेमसंबंधातून

विद्यार्थीनीचा खून प्रेमसंबंधातून

सांगली - येथील माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या शाळेतील वर्गात वैशाली रामदास मुळीक (वय २१, रा. कसबे डिग्रज) या विवाहित विद्यार्थिनीचा ओढणीने गळा दाबून खून केल्याप्रकरणी प्राध्यापकास सांगोला (जि. सोलापूर) येथून अटक करण्यात आली. ऋषिकेश मोहन कुडाळकर (२७, रा. कसबे डिग्रज) असे त्याचे नाव आहे. प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याला अटक केली. 

वैशालीचे मल्लेवाडी (ता. मिरज) हे माहेर आहे. कसबे डिग्रजमधील रामदास मुळीक यांच्याशी तिचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना दीड वर्षाचे मूलही आहे. शांतिनिकेतमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कला विभागाच्या दुसऱ्या वर्षात ती शिकत होती. 

तेथे शिकवणारा ऋषिकेश कुडाळकर हाही कसबे डिग्रजचा असल्याने त्यांची ओळख झाली. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. दरम्यानच्या काळात वैशाली हिचे अन्य एका मुलासोबत प्रेमसंबंध जुळले होते. तो राग ऋषिकेशच्या मनात होता. काही दिवसांपासून वैशाली ऋषिकेशला टाळत होती. त्यामुळे त्याने तिचा काटा काढण्याचा कट रचला. मुक्त विद्यापीठाचे वर्ग काल (रविवारी) असल्याने वैशालीला पती रामदासने सकाळी शांतिनिकेतमध्ये सोडले.

साडेनऊच्या सुमारास ऋषिकेश वैशालीला भेटला. बोलत बोलत कन्या शाळेतील तिसऱ्या मजल्यावर वर्गात घेऊन गेला. त्यावेळी त्याने वैशालीचा गळा ओढणीने आवळला. त्यातच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर ऋषिकेशने पळ काढला. एलसीबीच्या पथकाने त्याला सांगोला (जि. सोलापूर) येथून आज अटक केली. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, राजू कदम, अमित परीट, युवराज पाटील, महादेव धुमाळ, शशिकांत जाधव, विकास भोसले, अरुण सोकटे, संदीप पाटील यांचा कारवाईत सहभाग होता. 

सीसीटीव्हीचा आधार
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सकाळी नऊच्या सुमारास वैशाली आणि ऋषिकेश वर्गात जाताना दिसले. त्यानंतर सव्वादहा ते साडेदहाच्या दरम्यान ऋषिकेश शर्टच्या बाह्या मुडपून बाहेर जाताना सीसीटीव्हीत दिसतो. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी रचला होता कट
ऋषिकेश हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्राध्यापक म्हणून तासिका तत्त्वावर काम करत होता. त्याचा कसबे डिग्रज येथे केबलचा व्यवसायही आहे. याशिवाय एका मंत्री पुत्राचा तो मित्र असल्याचीही चर्चा आहे. तीन वर्षांपूर्वी वैशालीचा रामदासशी विवाह झाला. त्यानंतर ऋषिकेश आणि वैशालीची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. त्या वादातूनच दोन दिवसांपूर्वी घरात घुसून मारण्याचा कट ऋषिकेशने रचला होता. त्यानंतर सांगलीतील एका लॉजमध्येही त्याने मारण्याचा कट रचला होता. तोही अयशस्वी ठरल्याने अखेर त्याने वर्गातच गळा आवळून खून केल्याचे पोलिसांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com