नगर - 'विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुरुवारपासून (ता. 15) श्रीगोंद्यातून "हल्लाबोल' यात्रेस प्रारंभ होणार आहे. ही यात्रा 21 ठिकाणी जाणार असून, नाशिकला दहा मार्च रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत तिचा समारोप होईल,'' अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आज दिली. शेतकऱ्यांना मागील तीन वर्षांपासून शेततळे, ग्रीन हाउस, पॉलिहाउस, मल्चिंग, प्लॅस्टिक कागद, ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान मिळालेले नाही, ते तातडीने द्यावे, अशा आदी मागण्यांसाठी "हल्लाबोल' यात्रा काढण्यात येत असल्याचे घुले यांनी सांगितले. दरम्यान, पक्षाच्या कार्यालयात आयोजित बैठकीस विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मात्र अनेक कार्यकर्ते बैठकीला उशिरा आल्याने ते चांगलेच संतापले. "चार वर्षे झाली तरी अजून आपण सत्तेतच आहोत, असे कार्यकर्त्यांना वाटते. लोकांसाठी वेळ द्या,' असे आवाहन करीत त्यांनी भाजप सरकारच्या कारभारावर टीका केली. |
|