कृष्णाकाठच्या क्षेत्र माहुलीतील दुष्काळ संपला!

क्षेत्र माहुली (ता. सातारा) - कार्यान्वित झालेल्या २४ बाय ७ पाणी योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र.
क्षेत्र माहुली (ता. सातारा) - कार्यान्वित झालेल्या २४ बाय ७ पाणी योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र.

राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित; सातही दिवस २४ तास पाणी, ग्रामपंचायतीचे यश

सातारा - कृष्णाकाठच्या क्षेत्र माहुलीकरांना आता आठवड्याचे सातही दिवस, तेही दिवसातील २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी मिळत आहे.

राज्यातील तिसरी, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली, तर सातारा तालुक्‍यातील ही पहिलीच राष्ट्रीय पेयजल योजना आहे. २४ बाय ७ अशा या योजनेसाठी सुमारे एक कोटी ९५ लाख रुपये खर्च झाला आहे. ही योजना नुकतीच सुरू झाली. 

कृष्णाकाठावर असूनही क्षेत्र माहुलीस नेहमीच अनियमित व पुरेशा स्वच्छ नसलेल्या पाण्याचा पुरवठा होत होता. त्यावर मात करण्यासाठी मलकापूर येथील पाणी योजनेप्रमाणे गावात २४ बाय ७ पथदर्शी पाणीपुरवठा योजना करण्याचे ग्रामपंचायतीने ठरविले. ग्रामसभेत ग्रामस्थांनी या विचाराचे स्वागत केले. जिल्हा परिषदेकडून पाच फेब्रुवारी २०१४ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून या योजनेला मंजुरी मिळाली. तांत्रिक मान्यतेनंतर एक कोटी ९५ लाख २८ हजार ६८७ रुपये खर्चाची योजना आकारास येऊ लागली. या योजनेसाठी दहा टक्के रक्‍कम (सुमारे १९ लाख ५० हजार रुपये) गावाने भरणे आवश्‍यक होते. त्यासाठी ग्रामस्थ व गावातील काही दानशूरांनी पुढाकार घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर यांनी ‘जिल्हा नियोजन’मधून ५० टक्के रक्कम (११ लाख ४८ हजार रुपये) मंजूर केली. 

ही योजना साकारताना अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या स्वप्नातील ही योजना मूर्त स्वरूपात आली. या योजनेमुळे ग्रामस्थांना २४ तास पाणी उपलब्ध झाले आहे. गरज व मागणीप्रमाणे पाणी वापराची मुभा आहे. पाणी चालू, बंद करण्याचे नियंत्रण ग्रामस्थांकडे आहे. फेरुल सिस्टिममुळे ग्रामस्थांना समान दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. एचडीसी पाइपमुळे दीर्घकाळ दुरुस्तीचा प्रश्‍न उपस्थित होणार नाही. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ग्राहकांनी वापरलेल्या पाण्यासाठी टप्पेनिहाय दर आकारण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला जाणार आहे. कमी पाणी वापरासाठी कमी दर व जादा वापरासाठी जादा दर अशीच दर आकारणी करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. पाणीपुरवठा विभागाचे पुणे विभागीय आयुक्त श्रमिती धोंडे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या योजनेची पाहणी करून कौतुक केले आहे.

ग्रामस्थांच्या तळमळीला अधिकाऱ्यांची साथ
सतत स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी २४ बाय ७ पाणी योजनेचे स्वप्न ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने पाहिले. ही योजना पूर्णत्वास जावी, यासाठी ग्रामस्थांची सर्व तयारी होती. ग्रामसभेत लोकवर्गणी आकारण्याचा ठराव करत एकीने ग्रामस्थांनी मोठा हात दिला. ग्रामस्थांची तळमळ पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले. त्यामुळेच ही योजना गावासाठी संजीवनी ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com