जामखेड - 'राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण का करायचे?' असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उपस्थित केला. याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. मला याबाबत काही माहिती नाही. मात्र, याबाबतचा निर्णय चर्चा करूनच घेतला जाईल. परस्पर निर्णय घेता येणार नाही, असे ठाम मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त चौंडी येथे अभिवादनासाठी आले, त्या वेळी उदयनराजे पत्रकारांशी बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या समवेत होत्या. ज्येष्ठ नेते शरद पवार व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात नवी दिल्ली येथे झालेल्या चर्चेच्यासंदर्भात होत असलेल्या चर्चेबाबत पत्रकारांनी उदयनराजे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले, की विलीनीकरण कोणाबरोबर आणि का करायचे?
खासदार सुळे म्हणाल्या, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात नवख्या खासदार हेमामालिनी यांना पहिल्या रांगेत स्थान दिले जाते; मात्र शरद पवार यांच्यासारख्या 50 वर्षे देशाची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याला मागच्या रांगेत बसवले जाते, हे दुर्दैवी आहे. पवार आणि राहुल गांधी यांच्यात दर 15 दिवसांनी भेट होते. त्यात नवीन काही नाही. त्यामुळे या चर्चा निराधार आहेत.''
|